By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:58 IST
1 / 10ही कहाणी आहे अशा व्यक्तीची ज्याने त्याच्या बालपणात गरीबी आणि कर्जबाजारी आयुष्य पाहिले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या या व्यक्तीने वयाच्या १६ व्या शिक्षण सोडले. परंतु मेहनत करणे कधीही सोडले नाही.2 / 10या व्यक्तीने स्वत: फुलांची लागवड करणे सुरू केले. तेलंगणातील एका छोट्या गावातून पुढे येत बंगळुरूतील शेतांमध्ये १८ तास मजुरी करणाऱ्या बोल्लापल्ली श्रीकांत यांनी आज ७० कोटींची वार्षिक उलाढाल करणारी कंपनी उभी केली आहे. 3 / 10वेनसाई फ्लोरिटेक असं त्यांच्या कंपनीचे नाव आहे. त्यांना साऊथ इंडियात फ्लॉवर किंग म्हणून ओळखले जाते. श्रीकांत यांनी त्यांच्या यशामागे कुठल्याही कॉलेज डिग्रीला श्रेय न देता स्ट्रीट साइड एमबीए म्हणजे जमिनीवरील संघर्षाला दिले आहे. बोल्लापल्ली श्रीकांत यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. 4 / 10श्रीकांत यांचा प्रवास १९९५ पासून सुरू झाला. घरावर आर्थिक कर्ज आणि कुटुंबाची परिस्थिती पाहता कर्ज फेडण्यासाठी हातभार लागेल यासाठी ते बंगळुरूला गेले. तिथे एका फुलांच्या शेतात महिन्याला १ हजार रुपये मजुरीवर त्यांनी काम केले. 5 / 10या शेतात काम करताना ना केवळ फुलांविषयी त्यांना माहिती मिळाली तर सोबतच सेल्स आणि मार्केटिंगचे बारकावेही त्यांनी शिकून घेतले. केवळ २ वर्षानंतर वयाच्या १८ व्या वर्षी मित्रांकडून उधारी घेत आणि काही रक्कम साठवून २० हजारांची गुंतवणूक करून त्यांनी ओम श्री साई फ्लॉवर्स नावाचे छोटे दुकान सुरू केले.6 / 10पहिल्याच वर्षी त्यांच्या दुकानाचा टर्नओव्हर ५ लाख रुपये होता. श्रीकांत यांनी केलेली मेहनत फळाला आली. व्यापारात यश मिळाल्यानंतर श्रीकांत यांना क्वालिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत: शेती करणे गरजेचे आहे हे समजले. २००५ साली वेनसाई फ्लोरिटेक नावाची कंपनी त्यांनी उभारली. बंगळुरूजवळ जमीन खरेदी करून हाय टेक फार्मिंग सुरू केले.7 / 10आज श्रीकांत यांच्याकडे ७० एकरचं अत्याधुनिक शेत आहे. तिथले तापमान आणि वातावरणाला नियंत्रित ठेवण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये गुलाब, जरबेरा आणि कार्नेशन सारख्या २० पेक्षा जास्त प्रकारच्या फुलांची लागवड केली. त्यांच्या या नावीन्यपूर्ण शोधाची व्याप्ती इतकी आहे की एका डच ब्रीडरने त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मुलीच्या नावावर 'मोक्ष श्री' हे जरबेरा फुलाचे पेटंट घेतले आहे.8 / 10आज श्रीकांत यांची कंपनी भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्याऐवजी त्यांची फुले दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केली जातात. कंपनीने कोल्ड-चेन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे ज्यामुळे फुले तोडल्यानंतर लगेचच २-४ अंश सेल्सिअस तापमानात थंड होतात जेणेकरून त्यांचा ताजेपणा टिकून राहील. 9 / 10देशांतर्गत बाजारपेठेत श्रीकांत यांची कंपनी मोठ्या लक्झरी हॉटेल्स आणि हाय-प्रोफाइल लग्नांना फुले पुरवते. वर्षभर मागणी पूर्ण करण्यासाठी ते लिली आणि ऑर्किडसारख्या विदेशी जाती देखील आयात करतात. श्रीकांत यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल ₹७० कोटींवर पोहोचली आहे. असे असूनही ग्रोअर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून ते प्लास्टिकच्या फुलांविरुद्ध मोहीम चालवतात, जे पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी धोकादायक आहेत असं श्रीकांत यांचं म्हणणं आहे. 10 / 10श्रीकांत यांचं भविष्यातील ध्येय म्हणजे त्यांची शेती पूर्णपणे सौरऊर्जेवर वळवणे आणि रसायनांचा वापर कमी करणे. ३०० हून अधिक लोकांना रोजगार देणारे श्रीकांत हे अशा लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे जे संसाधनांच्या कमतरतेमुळे हार मानतात.