विमा क्षेत्रात ७४ टक्के FDI ला राज्यसभेची मंजुरी; निर्मला सीतारामन म्हणाल्या, "देशातच राहणार प्रिमियमचा पैसा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 01:02 PM2021-03-19T13:02:43+5:302021-03-19T13:13:57+5:30

FDI : देशातून मिळणारा पैसा देशातच राहणार असल्याची कायद्यात तरतूद केल्याची सीतारामन यांची माहिती

देशाचा अर्थसंकल्प मांडतना अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्के करणार असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, आता देशातील विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ही ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करणारं विमा सुधरणा विधेयक २०२१ हे राज्यसभेत पारित करण्यात आलं.

यावर संसदेत झालेल्या चर्चेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याच्याशी निगडीत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

विमा क्षेत्रातील प्रिमिअमच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेसंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता.

यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी देशातील विमा क्षेत्र हे सर्वाधिक रेग्युलेटेड क्षेत्र असल्याचं म्हटलं.

तसंच विमा उत्पादनपासून त्यातील उत्पादन, गुंतवणूक त्याचं मार्केटिंग हे सर्व नियामक ठरवत असल्याचंही त्या म्हणाल्या.

तसंच सरकारनं विमा क्षेत्रातून येणारा पैसा हा देशातच गुंतवला जाईल याची कायद्यात तरतूद केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीची कमाल मर्यादा ७४ टक्के इतकी निश्चित केली जात आहे. याचा अर्थ ही अनिवार्य अट नाही किंवा अचानक कंपन्यांकडे इतकी गुंतवणूकही येईल, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

कंपन्या आपल्या गरजेनुसार निर्णय करू शकतील. जर त्यांना पैशांची आवश्यकता असेल तर आम्ही त्यांना का रोखावं? असा सवालही त्यांनी केला.

१९९१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचा फायदा झाला. याचा लाभ आपण सर्वच जण घेत आहोत. यासाठी पी.व्ही. नरसिम्हा राव आणि मनमोहन सिंग यांना त्याचं श्रेय दिलं गेलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतं त्यावेळी त्यांनी या सुधारणा केल्या. प्रश्न हा आहे की आपण हा लाभ या ठिकाणी थांबवून पुढे जाऊ इच्छितो का? विमा क्षेत्राचा विस्तार होत आहे त्यांना निधीची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतवरही भाष्य केलं. थेट परकीय गुंतवणूकीतून मिळणारा पैसा याच ठिकाणी गुंतवला जाईल. इथे या पैसा कमवा आणि पळून जा असं आम्ही म्हणत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी एका खासदारानं विजय माल्याचं नावदेखील घेतलं. यावर निर्मला सीतारामन यांनी पलटवार करत विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या सर्वांना आपण परत आणतोय आणि ही आत्मनिर्भरता आहे. त्यांना देशाच्या कायद्याचा सामना करावा लागणार असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं.

दरम्यान, ही गुंतवणूक ७४ टक्के करताना नियामन इरडाशी आपण विस्तृत चर्चा केल्याचंही त्या म्हणाल्या.

थेट परकीय गुंतवणूकीचं ध्येय हे लाईफ इन्श्युरन्स अनेकांपर्यंत पोहोचवणं हे असल्याचंही त्यांनी नमूद केलं.