शेअर बाजारातून एक्झिट घेण्याचा विचार करताय? मग 'हा' इतिहास माहिती पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 11:01 IST2025-03-02T10:57:59+5:302025-03-02T11:01:30+5:30
Indian Stock Market : जर तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर सध्याची घसरण पाहून कुठलेही पाऊल उचलण्याआधी इतिहास जाणून घेतला पाहिजे. जेणेकरुन रननिती आखण्यास मदत होईल.

गेल्या ४ महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. गुंतवणूकदारांनी मागील काही वर्षात कमावलेला नफा कमी होऊन त्यांचा पोर्टफोलिओ रेड झोनमध्ये गेले आहेत. पण, भारतीय बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा शेअर बाजार कोसळला आहे. भारतीय शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत बाजारात ८ मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर इतिहासातून शिकून तुम्ही तुमची रणनीती बनवू शकता.
पहिल्यांदा १९९२ मध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली. याला कारणीभूत ठरला हर्षद मेहता सिक्योरिटी घोटाळा. हर्षद मेहता हा स्टॉक ब्रोकर होता. मेहता याने फसव्या निधीचा वापर करून शेअरच्या किमतीत फेरफार केला होता. यानंतर सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावरून ५६ टक्क्यांनी घसरला. १९९२ मध्ये सेन्सेक्स ४,४६७ वरून एप्रिल १९९३ पर्यंत १,९८० पर्यंत घसरला. या घसरणीनंतर बाजार सावरायला २ वर्षे लागली.
आशियाई आर्थिक संकटामुळे १९९७ मध्ये शेअर बाजारातील मोठी घसरण झाली. यामुळे डिसेंबर १९९७ मध्ये सेन्सेक्स ४,६०० अंकांवरून ३,३०० अंकांवर किंवा २८ टक्क्यांहून अधिक घसरला. ही घसरण थांबून शेअर बाजार सावरायला एक वर्ष लागले.
टेक बबल बर्स्ट मुळे २००० साली शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स फेब्रुवारी २००० मध्ये ५,९३७ वरून ४३ टक्क्यांनी घसरून ऑक्टोबर २००१ मध्ये २,४०४ वर आला. गुंतवणूकदारांनी तंत्रज्ञानावरून इतर क्षेत्रांकडे लक्ष वळवल्यानंतर शेअर बाजार हळूहळू सावरला.
२००४ मध्ये यूपीए आघाडीच्या अनपेक्षित विजयामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली होती. १७ मे २००४ रोजी, सेन्सेक्स १५ टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे बाजारात जास्त विक्री झाल्यामुळे व्यापार थांबला. पुढील २-३ आठवड्यांत बेंचमार्क इंडेक्स इंट्राडे निवडणुकीच्या धक्क्यातून सावरला.
अमेरिकेतील लेहमन ब्रदर्सचे पतन आणि सबप्राइम मॉर्टगेज संकटामुळे जागतिक मंदी आली. याचा मोठा फटका बाजाराला बसला. जानेवारी २००८ मध्ये २१,२०६ च्या शिखरावरून, ऑक्टोबर २००८ पर्यंत सेन्सेक्स ६० टक्क्यांहून अधिक घसरून ८,१६० वर आला. सरकारी प्रोत्साहन उपाय आणि जागतिक तरलता यामुळे २००९ पर्यंत बाजार पुन्हा उभा राहिला.
चीनच्या बाजारातील मंदी, वस्तूंच्या किमती घसरल्याने आणि देशांतर्गत नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) वाढल्याने शेअर बाजार घसरला. जानेवारी २०१५ मध्ये सेन्सेक्स ३०,००० वरून फेब्रुवारी २०१६ मध्ये २२,९५१ पर्यंत घसरला. अशा प्रकारे सेन्सेक्स २४ टक्क्यांनी घसरला. घसरणीनंतरही, भारताच्या आर्थिक ताकदीमुळे सेन्सेक्स १२-१४ महिन्यांत सावरला.
कोविड-१९ महामारीमुळे जगभरातील लॉकडाऊन आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे मार्च २०२० मध्ये शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स ३९ टक्क्यांनी घसरला, जानेवारी २०२० मध्ये ४२,२७३ वरून मार्च २०२० मध्ये २५,६३८ वर घसरला. सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे २०२० च्या अखेरीस तांत्रिक मंदी असतानाही अर्थव्यवस्थेने चांगली रिकव्हरी केली.
सध्या भारतीय बाजारपेठेत मोठी घसरण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे होत आहे. दुसरीकडे भारतीय जीडीपीमध्येही मंदीची भीती आहे. याशिवाय रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री हीही प्रमुख कारणे आहेत. गेल्या ५ महिन्यांत सेन्सेक्स ११.५४ टक्क्यांनी घसरला आहे, तर निफ्टी १२.६५ टक्क्यांनी घसरला आहे. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ९२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.