आता घरबसल्या मिळणार सिमकार्ड, Aadhaar द्वारे सहजरित्या बदलू शकता कनेक्शन; नियमांत मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:38 AM2021-09-22T10:38:04+5:302021-09-22T10:48:24+5:30

New Mobile Connnection at doorstep online verification : आता मोबाईल कनेक्शन घेणं झालं सोपं. वाचा घरबसल्या नवं कनेक्शन घेण्यासाठी किती लागणार शुल्क.

आता मोबाईल सिम मिळवणे सोपे झाले आहे. दूरसंचार मंत्रालयाने मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी नवीन मोबाईल कनेक्शन ऑनलाइन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर आता घरबसल्या नवे सिमकार्ड मिळवणे सोपे झाले आहे.

यासाठी ग्राहकांची पडताळणी आधार किंवा डिजीलॉकरमध्ये ठेवलेल्या कोणत्याही पात्र दस्तऐवजाच्या आधारे केली जाईल. दूरसंचार विभागाचे हे पाऊल १५ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणातील नियमांचाच एक भाग आहे.

नवीन नियमांनुसार, ग्राहकांना नवीन मोबाईल कनेक्शनसाठी आधार नियामक UIDAI च्या आधार आधारित ई-केवायसी सेवांद्वारे आपली ओळख प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेसाठी १ रुपये शुल्क भरावे लागेल.

सरकारने नवीन मोबाईल कनेक्शनसाठी आधार आधारित ई-केवायसी प्रक्रियेसाठी जुलै २०१९ मध्ये भारतीय टेलिग्राफ कायदा, १८८५ मध्ये आधीच सुधारणा केली आहे.

दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार, दूरसंचार कंपन्या आधार ई-केवायसीद्वारे नवीन मोबाईल कनेक्शन देण्याची प्रक्रिया राबवतील. ही प्रक्रिया स्थानिक, आऊटस्टेशन आणि बल्क ग्राहकांसाठी लागू असेल. तथापि, एका व्यक्तीसाठी किंवा आऊटस्टेशन ग्राहकासाठी एका दिवसात फक्त एक मोबाईल कनेक्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू राहिल.

नवीन मोबाईल फोन कनेक्शनसाठी स्व-प्रमाणित प्रक्रियेअंतर्गत ग्राहकांना अॅप किंवा वेबसाइटवर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा ओळखीचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करावी लागेल. यानंतर फोन नंबरची OTP द्वारे पडताळणी केली जाईल.

सध्या, त्यांचे कोणतेही मोबाईल कनेक्शन प्रीपेड ते पोस्टपेड किंवा पोस्टपेड ते प्रीपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी, ग्राहकांना ओळख आणि पत्त्याच्या मूळ पुराव्यासह जवळच्या दुकानात केवायसी प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, आता ही प्रक्रिया घरबसल्याच करता येणार आहे.

पोस्टपेडचे प्रीपेड किंवा प्रीपेडचे पोस्टपेड कनेक्शनमध्ये रूपांतर करण्यासाठी ओटीपी आधारित प्रक्रियेला सरकारने मान्यता दिली आहे. ओटीपी मोडद्वारे मोबाईल कनेक्शन रूपांतरण सेवा जम्मू -काश्मीर वगळता देशाच्या इतर भागांमध्ये लागू होईल.

या कन्व्हर्जन दरम्यान, सेवांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु त्या जास्तीत जास्त अर्धा तास राहतील. अर्थात कन्व्हर्जन दरम्यान कॉल कनेक्शन इत्यादी समस्या असू शकते. परंतु ती अर्ध्या तासात सोडवली जाईल.

दोन कन्व्हर्जन्समध्ये किमान ९० दिवसांचे अंतर असणे अनिवार्य आगहे. याचाच अर्थ जर तुम्ही प्रीपेडमधून पोस्टपेड सेवेत जात असाल किंवा पोस्टपेडमधून प्रीपेड सेवेत येत असाल तर तुमची सेवा किमान ९० दिवस सुरू राहणं आवश्यक आहे.