७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:34 IST2025-08-05T16:16:26+5:302025-08-05T16:34:43+5:30

विमानातून प्रवास करताना जसे सामान घेण्याचा नियम आहे तसाच नियम ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी सुद्धा आहे.

भारतात रेल्वेचे मोठे जाळे आहे. लांबचा प्रवास करण्यासाठी आपण हमखास रेल्वे निवडतो.पण, आपल्याला अजूनही रेल्वेचे काही नियम माहित नाहीत.

आपण प्रवास करत असताना ट्रेनमध्ये सामान वाहून नेण्यावरही मर्यादा आहे. ट्रेनमध्ये तुम्ही किती सामान सोबत घेऊन जाऊ शकता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

रेल्वेच्या नियमांनुसार, प्रत्येक वर्गात मोफत सामानाची मर्यादा वेगळी असते. समजा जर एसी फर्स्ट क्लासमध्ये, प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ७० किलो पर्यंत सामान वाहून नेऊ शकतात.

तसेच एसी २-टियरमध्ये ही मर्यादा ५० किलो एवढी आहे. एसी ३-टियर आणि स्लीपर क्लासमध्ये, प्रवाशांना ४० किलो पर्यंत सामान सोबत नेण्याची परवानगी आहे.

जनरल क्लासमध्ये, ही मर्यादा ३५ किलो आहे. हे नियम प्रवाशांना आरामात प्रवास करण्यास मदत करतात. जर तुमचे सामान यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागतात. हे शुल्क आताच्या दरापेक्षा १.५ पट जास्त आहेत.

जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन गेलात तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागतील किंवा आधीच बुकिंग करावे लागेल.

जर एखादा प्रवासी ठरलेल्या सामानापेक्षा जास्त सामान घेऊन जाताना पकडला तर टीटीई किंवा बॅगेज इन्स्पेक्टर जागेवरच दंड आकारू शकतात.

आता अनेकांना या दंडाची रक्कम किती असेल हा प्रश्न पडला असेल. तर तुमच्या सामानाच्या अतिरिक्त वजनावर आणि प्रवासाच्या अंतरावर अवलंबून हा दंड असतो.

रेल्वेच्या नियमानुसार, एखाद्या प्रवाशाला जास्त सामान घेऊन जायचे असेल तर तो प्रवासापूर्वी पार्सल ऑफिसमधून सामान बुक करू शकतो.

टॅग्स :रेल्वेrailway