१७ वर्षाच्या मुलीला मिळाली ३०० कोटींची कंपनी, केली कमाल; व्यवसाय पोहोचला ८००० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 08:29 AM2023-10-31T08:29:34+5:302023-10-31T08:58:11+5:30

आपल्या नवीन रणनीती आणि कल्पनेच्या जोरावर त्यांनी कंपनीची धुरा आपल्या हाती घेतली आणि कंपनीला त्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचवलं.

व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या मुलांसाठी व्यवसायाच्या क्षेत्रात हात आजमावणं फारसे अवघड ठरत नाही. परंतु अनेक व्यावसायिक कुटुंबातील मुलं आपल्या कल्पना आणि मेहनतीच्या जोरावर आपला व्यवसाय नवीन उंचीवर घेऊन जातात.

भारतातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी एक असलेल्या पार्ले अॅग्रोच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी नादिया चौहान यांची यशोगाथाही अशीच आहे. आपल्या नवीन रणनीती आणि कल्पनेच्या जोरावर त्यांनी कंपनीची धुरा आपल्या हाती घेतली आणि ३०० कोटींवरून ८००० कोटींचा ब्रँड बनवला.

पार्ले समुहाची स्थापना १९२९ साली मोहनलाल चौहान यांनी केली. १९५९ मध्ये त्यांचा धाकटा मुलगा जयंतीलाल यांनी शीतपेयांचा व्यवसाय सुरू केला. लिम्का, माझा, गोल्ड स्पॉट, थम्स अप असे ब्रँड त्यांनी सुरू केले. पण १९०० मध्ये पार्लेनं ही उत्पादनं कोका-कोलाला विकली.

नादिया चौहान यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. पण त्या मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्याचं शालेय शिक्षणही इकडेच झालं. यानंतर त्यांनी एचआर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

नादिया यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच व्यवसायासाठी तयार केलं होतं, असं सांगितलं जातं. शाळेनंतरचा बहुतेक वेळ त्या मुंबईतील पार्ले ॲग्रोच्या मुख्यालयात घालवत असत आणि कामातील बारकावे आपल्या वडिलांकडून शिकत. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी कामाच्या निमित्तानं पार्ले ॲग्रोमध्ये पाऊल ठेवलं.

व्यवसायात उतरल्यानंतर नादिया यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. त्‍यामुळे त्यांचं नाव तर मोठं झालंच पण त्‍याच्‍या प्रोडक्‍टलाही लोक पसंती देऊ लागले. त्याची बाजारात आजही मोठी मागणी आहे. सर्वप्रथम नादियानं समुहात 'बेलीज' नावाचा पॅकेज वॉटर ब्रँड सुरू केला. जी आता मोठी ओळख बनली आहे. आता बेलिसचा १००० कोटींहून अधिकचा व्यवसाय झाला आहे.

२००५ मध्ये नादिया यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी जोखीम पत्करली आणि ॲपल ज्युस Appy Fizz लाँच केलं. तोपर्यंत अशा प्रकारचा ॲपल ज्युस उपलब्ध नव्हता. लोकांना त्याची चव खूप आवडली आणि त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीला फायदा झाला.

तेव्हापासून शीतपेयांच्या बाजारात अशा ज्युसची संख्या वाढली. नादिया यांनीच फ्रूटीला बाजारात आणायचं ठरवलं होतं. आज फ्रूटी सर्व वयोगटातील लोकांच्या पसंतीस उतरत आहे. फ्रूटी आणि ॲपी फिझ आज ५० पेक्षा जास्त देशांतील लोकांच्या पसंतीस उतरली आहे. आज त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पार्ले ॲग्रो ही कंपनी ८००० कोटींहून अधिक किमतीची बनवली आहे.