Vijayadashami 2021: भारतीयांची रावणावरही श्रद्धा! ‘या’ ४ ठिकाणी होते पूजन, श्राद्ध; पाहा, मान्यता आणि परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:49 PM2021-10-13T19:49:44+5:302021-10-13T19:55:35+5:30

Vijayadashami Dussehra 2021: देशभरात रावणदहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, काही ठिकाणी या दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा असल्याचे दिसून येते.

भारतात वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण-उत्सवांना धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व तर असतेच; शिवाय व्यवहारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सवांना महत्त्व असल्याचे अनेक उदाहरणांतून दाखवता येऊ शकते. चातुर्मासातील दिवाळीपूर्वी साजरा केला जाणारा सण म्हणजे दसरा. (vijayadashami 2021)

नवदुर्गेच्या विविध रुपांनी महिषासुरासह अनेक दैत्य, राक्षस, असुरांचा वध करून विजय प्राप्त करून देवांसह समस्त प्राणीमात्रांना भयमुक्त केले. म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. (dussehra 2021)

या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. देशभरात रावणदहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, देशातील काही ठिकाणी या दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा असल्याचे दिसून येते. (ravana worship in india)

उत्तर प्रदेशातील बिसरख येथे दसऱ्याला रावणदहन केले जात नाही. याउलट, येथे रावणाचे पूजन केले जाते. बिसरख म्हणजे ऋषी विश्रवा. ऋषी विश्रवा हे रावणाचे वडील होते. त्यांच्याच नावावरून या भागाला बिसरख असे संबोधले जाते. याच ठिकाणी रावणाचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे.

विश्रवा ऋषींनी या भागातील एक स्वयंभू शिवलिंगाचा शोध लावला होता. तेव्हापासून स्थानिक गावकरी ऋषी विश्रवा आणि रावण या दोघांची पूजा करतात. याशिवाय नवरात्रातील कालावधीत रावणाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी विशेष होम-हवन, शांती यज्ञ करण्याची प्राचीन परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते.

उत्तर प्रदेशातील बिसरखप्रमाणे महाराष्ट्रातील गडचिरोली येथे रावणाचे पूजन केले जाते. गडचिरोली येथील गोंड समाजाकडून रावण पूजन केले जाते. या गोंड समाजात केवळ रावणाला नाही, तर रावणाच्या सर्व पुत्रांनाही देवतांचे स्थान देण्यात आले आहे.

त्यामुळे रावणासह त्याच्या पुत्रांचे पूजनही या ठिकाणी केले जाते. गोंड समाजातील काही मान्यतांप्रमाणे रावण हा वाईट माणूस नव्हता. तसेच रावणाने सीता देवीला बदनाम केले नव्हते, अशी लोकमान्यता या ठिकाणी असल्याचे सांगितले जाते.

हिमाचल प्रदेशातील कांगडा भागात रावणदहन केले जात नाही. याउलट येथे रावणाची पूजा केली जाते. रावणाने मोठे तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतले होते. कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवांनी रावणाला वरदान होते. कांगडा भागात हा प्रसंग घडल्याचे मानले जाते. त्यामुळे रावणाची भोलेनाथांचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून पूजा केली जाते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश येथे रावण पूजन केले जाते. मात्र, जोधपूर येथे रावणाच्या नावाने चक्क पिंडदान करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते. या भागातील मौदगील ब्राह्मण रावणाच्या विवाहाच्या दरम्यान जोधपूरमध्ये आले होते. ते त्यांना रावणाचे वंशज मानतात.

त्यामुळे हा समाजात रावणदहन केले जात नाही. याउलट रावणाच्या नावाने पिंडदान केले जाते. रावणाला पूर्वज मानून पिंडदानाचे विधी केले जातात आणि रावणाच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

रामायण केव्हा घडले आणि रावणाचा वध नेमका केव्हा झाला, याच्या कालावधीबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसले, तरी या संशोधकांच्या गटाने रावणाचा वध सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाल्याचा दावा करण्यात येतो.

रैगलाच्या घनदाट जंगलात ८ हजार फूट उंचीवर एक गुहा आहे. याच गुहेच रावणाचे शव एका पेटीत मामी स्वरुपात जतन करून ठेवल्याचे सांगितले जाते. या शवपेटीवर विशेष प्रकारचे लेपन करण्यात आले असून, याच लेपनामुळे कित्येक हजार वर्षांनंतरही ते तसेच राहिले असल्याचा दावा संशोधकांच्या गटाने केला आहे.

Read in English