Palmistry : तुमची प्रेमकहाणी पूर्ण होणार की अधुरी राहणार, हे हस्तरेषा सांगणार; कशी ते पहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:16 IST2025-02-06T16:07:11+5:302025-02-06T16:16:26+5:30
Palmistry: ज्योतिषशास्त्रानुसार आपण आयुष्यात किती यशस्वी होऊ हे नियती ठरवते आणि त्याला प्रयत्नांची जोड देणे आपल्या हाती असते. कुंडलीतील ग्रहदशेप्रमाणेच हस्तरेषा शास्त्र प्रत्येक व्यक्तीची भाग्यरेषा, आरोग्य रेषा, करिअर रेषा आणि वैवाहिक जीवनरेषा दर्शवते. हे भाकीत आपल्याला सावध करते अथवा योग्य दिशेने जात आहोत की नाही यासंदर्भात मार्गदर्शन करते.

हस्तरेषा शास्त्राचाही सखोल अभ्यास आहे, कारण ते एक गूढ शास्त्र आहे. मात्र त्याची तोंड ओळख म्हणून काही बाबी आपण आपला हात पाहून जाणून घेऊ शकतो. तूर्तास आगामी व्हॅलेन्टाईन्स डे (Valentine's Day 2025) च्या पार्श्वभूमीवर प्रेमजीवन कसे असेल, ते जाणून घेऊ.
प्रेम आणि विवाह रेषा :
हस्तरेषा शास्त्रानुसार हाताच्या करंगळीच्या खाली दिसणाऱ्या रेषांना विवाह रेषा किंवा प्रेमरेषा म्हणतात. या रेषा कोणत्याही व्यक्तीच्या प्रेम-वैवाहिक जीवनाबद्दल संकेत देतात. या रेषा आपल्या जीवनातील प्रेम प्रवास दर्शवतात. त्यावरून कळते की, तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करू शकता किंवा नाही. केला तरी तो टिकणार की नाही. एवढेच नाही तर या रेषा किती विवाह आपल्या भाग्यात आहे याचेही भाकीत वर्तवते.
प्रेमकहाणी अपूर्ण राहण्याचे संकेत :
असे म्हणतात की ज्या लोकांच्या तळहातावर बुध आणि मंगळाच्या अनेक रेषा असतात त्यांना प्रेमात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांची प्रेमकहाणी अपूर्ण राहू शकते आणि त्यांना वेगळे व्हावे लागू शकते. तसेच ज्यांची हृदयाची रेषा थोडीशी झुकलेली असते, अशा लोकांची प्रेमात फसवणूक होऊ शकते, ज्यामुळे प्रेमभंग होऊ शकतो.
प्रेम संबंध मध्येच तुटतात :
हस्तरेषा शास्त्रानुसार हृदयाची रेषा मध्यभागी तुटल्यास प्रेम संबंध तुटतात. अशा लोकांचे प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलू शकत नाहीत. असे लोक प्रेमभंग झाल्यामुळे भावविवश होतात आणि पुन्हा प्रेमात पडण्यास वा कोणावर विश्वास ठेवण्यास घाबरतात.
लाभदायी प्रेम अथवा विवाह रेषा कोणती?
हस्तज्योतिष तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या तळहातावरील विवाह रेषा दोन्ही हात जुळल्यावर अर्ध चंद्र दिसत असेल तर तुमची प्रेमकहाणी यश चोप्रा यांच्या चित्रपटापेक्षाही अधिक रंगतदार होईल आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत जोडीदाराची प्रेमळ साथ सुटणार नाही.