Navratri 2021: शारदीय नवरात्रीची सुरुवात नेमकी कशी व कधीपासून झाली? पाहा, मान्यता व पुराण कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 06:22 PM2021-10-09T18:22:04+5:302021-10-09T18:26:07+5:30

Shardiya Navratri 2021: नवरात्राची कहाणी काय? नवरात्र कधीपासून साजरे केले जाते? यासंदर्भात काय पुराणकथा आढळते? जाणून घ्या...

भारतीय संस्कृतीत व्रत-वैकल्ये, सण-उत्सव, परंपरा यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण, उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाते. यातील एक प्रमुख उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. (Shardiya Navratri Story in Marathi)

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी यादरम्यान नवरात्र साजरे करण्यात येते. यंदाच्या वर्षी ७ ऑक्टोबरपासून नवरात्रारंभ झाला आहे. या नऊ दिवसात देवीच्या विविध नवरुपांची पूजा केली जाते. दुर्गा देवीच्या उपासनेसाठी नवरात्र हे अत्यंत शुभ व विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. मात्र, नवरात्राची कहाणी काय? नवरात्र कधीपासून साजरे केले जाते? यासंदर्भात काय पुराणकथा आढळते? जाणून घेऊया...

काही धार्मिक ग्रंथ आणि पुराणांनुसार, शारदीय नवरात्राचे महत्त्व विशेष करून अधोरेखित करण्यात आले आहे. दुर्गा देवीचे नामस्मरण, आराधना, उपासना, जप यांसाठी शारदीय नवरात्राचा कालावधी अगदी शुभ लाभदायक आणि सर्वोत्तम मानला गेला आहे. शरद ऋतुच्या प्रारंभी हे नवरात्र येत असल्यामुळे याला शारदीय नवरात्र म्हणतात, असे सांगितले जाते. नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.

प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. नवरात्र साजरे करण्याविषयी दोन पौराणिक कथा आढळून येतात.

एका पौराणिक कथेनुसार, महिषासुर नामक दैत्य राक्षस ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले होते. पृथ्वीवर निवास करणारा कोणताही मनुष्य अथवा देव किंवा अन्य दानव यांपैकी कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही, असे ते वरदान होते. ब्रह्मदेवांकडून वरदान घेतल्यावर महिषासुर अहंकारी झाला. तीनही लोकांवर विजय मिळवून तो क्रूरकर्मा बनला आणि सर्व ठिकाणी हाहाःकार माजवू लागला.

अवघ्या काही काळातच तीनही लोकांत महिषासुराची दहशत पसरत गेली. महिषासुर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आवाहन केले. देवीच्या या शक्ती रुपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले. प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला.

यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली, अशी पुराण कथा असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या एका कथेनुसार, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणावर विजय मिळावा, यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. श्रीरामांनी नऊ दिवस देवीचे पूजन, नामस्मरण, आराधना केली होती.

श्रीरामांनी केलेल्या पूजनाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि श्रीरामांना लंका विजयाचा शुभाशिर्वाद दिला. यानंतर दहाव्या दिवशी रावणाचा युद्धात वध करून लंका विजय साध्य केला. या दिवसाला विजयादशमी म्हणून पुढे ओळखले गेले. अशी एक पुराण कथा असल्याचे सांगितले जाते.

तर, सहाव्या दिवशी कात्यायणी देवी, सातव्या दिवशी कालरात्रि देवी, आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना केली जाते.