Mahashivratri 2022: नंदीशिवाय शिवमंदिर कधी ऐकलेय? पाहा, महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणचे अद्भूत रहस्य आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 03:53 PM2022-02-27T15:53:34+5:302022-02-27T16:00:06+5:30

Mahashivratri 2022: पेशव्यांच्या काळात या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला आणि त्याला आजचे स्वरूप लाभले, असे सांगितले जाते.

अन्य सण-उत्सवांपैकी मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला एक सण म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी महादेव शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन हजारो भाविक पूजन, भजन, नास्मरण करत असतात. पवित्र मानल्या गेलेल्या माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली होता. यंदाच्या वर्षी ०१ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. (Mahashivratri 2022)

आपल्या देशात त्रिमुर्तींपैकी एक असलेल्या शिवनाथांची शेकडो मंदिरे आहेत. शिवावर श्रद्धा असणारे भाविक केवळ भारतात नाही, तर परदेशातही आहेत. शिवस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास पर्वत, अमरनाथ गुफा येथील अनेक रहस्ये आपल्याला केवळ अद्भूत करणारी अशीच आहेत. विज्ञानाकडेही या स्थळांच्या चमत्कारिकतेबाबत उत्तरे नाहीत.

देशभरातील शिवमंदिरांमध्ये एक गोष्ट अगदी सामान्य असते. ती म्हणजे शिवमंदिरातील नंदी. नंदी हे शिवाचे वाहन मानले जाते. नंदीशिवाय शिवमंदिर ही कल्पनाच कुणी केली नसेल. मंदिर छोटे असो वा मोठे असो, शिवपिंडीसमोर नंदी विराजमान असतोच. मात्र, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक शिवमंदिर आहे, ज्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचे दिसत नाही.

नाशिक शहरात गोदावरी जिथे दक्षिणवाहिनी झाली, त्या रामकुंडासमोरच्या टेकडीवरचे श्री कपालेश्वर महादेव मंदिर. श्रीविष्णुंनी स्वतः शिवपिंडीची स्थापना केली असल्याने, कपालेश्वर दर्शनातून बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य लाभते असे मानले जाते. कपालेश्वर अर्थात साक्षात शंकरांनी इथे निवास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो.

शंकरासमोर नंदी नसलेले हे एकमेव मंदिर असावे, अशी मान्यता आहे. नंदी नसल्याची आख्यायिका पुराणात आढळते. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणाऱ्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत, तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतप्त झालेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले.

शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते. एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोऱ्हा (नंदी) एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोऱ्हा म्हणाला की, मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार. त्यावर त्या गायीने त्यास म्हटले की, तू हे केलेस तर तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल.

त्यावर नंदी म्हणाला की, मला त्यावरचा उपाय माहीत आहे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीला वेसण घालायला आला असताना, नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतं हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागले. त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रातील (रामकुंड) त्रिवेणी संगमावर (अरुणासंगम) येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ रंग त्याला परत मिळाला.

ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले आणि हाताला चिकटलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली, अशी आख्यायिक सांगितली जाते. गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे तुला माझ्यापुढे बसण्याची गरज नाही, तू गुरुसमान आहेस, असे शंकराने नंदीस सांगितले.

त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात (गोदावरीतच) विसावला आहे, असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार १२ ज्योर्तिलिंगानंतर 'कपालेश्वर' मंदिराचं महत्त्व आहे, असे सांगितले जाते.

कपालेश्वर मंदिर असलेल्या टेकडीवर पूर्वी फक्त शिवपिंडी होती. नंतर पेशव्यांच्या काळात या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला आणि त्याला आजचे स्वरूप लाभले. १७२८ मध्ये कोळी बांधवांनी या मंदिराची बांधणी केली. १७६३ मध्ये जगजीवनराम पवार यांनी मंदिर प्रांगणाचा विस्तार केला. कृष्णाजी पाटील पवार यांनी पायऱ्या बांधून दिल्या, असे सांगितले जाते.

कपालेश्वराच्या पायऱ्या उतरून खाली आले की, समोर गोदावरी नदी आहे. या परिसरात श्री काळाराम, गंगा-गोदावरी, सीतागुंफासारखी इतरही बरीच मंदिरे आहेत. कपालेश्वर मंदिराच्या समोरच गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. रामकुंड परिसरातही अनेक पवित्र कुंड असून प्रत्येक कुंडाचे वेगळे महत्त्व आहे. सीताकुंड, धनुष्यकुंड, अहिल्याकुंड, दुतोंड्या मारुतीकुंड, सूर्यकुंड आदी कुंड आहेत. रामकुंडाच्या येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते.

प्रत्येक सोमवार, प्रदोष व महाशिवरात्रीच्या दिवशी कपालेश्वर मंदिरात महापूजा केली जाते. या पूजेला शंकर सर्व ग्रहांना आमंत्रित करतात, असे सांगितले जाते. याच अख्यायिकेमुळे ग्रहदोष असलेल्या व्यक्ती अथवा ग्रहांचा कृपाशीर्वाद मिळविण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात. वर्षभरातला आणखी एक उत्सव म्हणजे हरि-हर भेट. यावेळी कपालेश्वर मंदिरातून श्री शंकर, तर सुंदर नारायण मंदिरातून श्री विष्णूंचा मुखवटा गोदावरी नदीवर आणतात. त्यांच्यावर अभिषेक केला जातो. त्यावेळी मोठा उत्सव भरतो.