Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:40 IST
1 / 6ज्यांच्या घरी गणपती येतो त्यांच्याकडे सोवळे पाळले जाते, परंतु ज्यांच्याकडे गणपती येत नाही, त्यांनी देखील निदान गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पासाठी सोवळे पाळायला हवे, असे शास्त्र सांगते. सोवळे पाळायचे म्हणजे नेमके काय करायचे, हे समजून घेण्यासाठी पुढे दिलेल्या पाच चुका कटाक्षाने टाळा, जेणेकरून घरातले पावित्र्य अबाधित राहील.2 / 6गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या सोयीच्या वेळेत न करता दिलेल्या शुभ मुहूर्ताच्या आतच करा. भारतीय पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्रीणेश चतुर्थी, गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. २७ ऑगस्ट २०२५ पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होईल. 3 / 6आपल्या घरात गणपती बसत नसले, तरी देव्हाऱ्यातल्या गणपतीची यथासांग पूजा करून गूळ, खोबरे किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवा. पूजेसाठी सकाळी वेळेत उठून स्नान आटोपून दाराला आम्रपल्लव लावा. त्यादिवशी अंघोळीचा आळस करू नका. आणि गणपती बाप्पा घरी येणार असले तर सगळ्यांच्या आधी उठून स्नान आटोपून बाप्पाच्या स्वागताला सज्ज राहा.4 / 6गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरात साग्रसंगीत नैवेद्याचा स्वयंपाक असो वा नसो, कांदा-लसूणाचा वापर टाळा. कांदा लसूण हे उग्र आणि वासना वाढवणारे पदार्थ मानले जातात. उत्सव काळात भक्तिभावे बाप्पाच्या चरणी लीन व्हायचे असेल तर एवढा त्याग तर आपण केलाच पाहिजे.5 / 6मांसाहार टाळा. अनेक जण श्रावण संपला म्हणून आनंदाने मांसाहार सुरू करतात, परंतु निदान गणेश चतुर्थीच्या दिवशी सात्विक आहार घेऊन सणाचे पावित्र्य राखा. काही घरांमध्ये गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, पण शास्त्राचे म्हणाल तर तसा उल्लेख कुठेही केला नाही, त्यामुळे वर्षानुवर्षे चालणारा प्रघात या नावाखाली मांसाहारी नैवेद्य करायचा आणि आपणही तो ग्रहण करायचा हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही.6 / 6बाप्पाची मूर्ती आणखी आकर्षक दिसावी या नादात अलंकार, पुष्पहार घालताना सावधानता बाळगा. मूर्ती नाजूक असते. तिला थोडा जरी धक्का लागला तर ती दुभंगून जाऊ शकते आणि आपल्या हातून मूर्ती भग्न झाल्याची हुरहूर मनाला लागून राहते. म्हणून बाप्पाच्या मूर्तीची सर्वतोपरी काळजी घेत बाप्पाला सही सलामत निरोप द्या. म्हणजे तुम्ही खुश आणि तुमचा पाहुणचार घेऊन बाप्पाही खुश!