Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी प्रसिद्धी पराङ्मुख राहिलेल्या ११ रामभक्तांचा त्याग वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:59 PM2024-01-25T16:59:21+5:302024-01-25T17:05:06+5:30

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर व्हावे अशी अनेक रामभक्तांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग खरोखरीच थक्क करणारा आहे. एवढे करून हे सगळे चेहरे प्रसिद्धी पासून कोसो दूर राहिले. राम मंदिर व्हावे एवढीच इच्छा ठेवून व्रतस्थ जीवन जगले. त्यांच्या कार्याचा सर्वेश फडणवीस यांनी घेतलेला थोडक्यात आढावा.

बुंदेलखंडमधील दतिया येथील एक व्यक्ती मौनी बाबा म्हणून प्रसिद्ध आहे. मौनी बाबांनी १९८० मध्ये राम मंदिर होईपर्यंत अन्न घेणार नाही अशी शपथ घेतली होती. गेल्या ४४ वर्षांपासून ते फक्त फळे खाऊन जगत असून पुढे १९८४ साली त्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी पायात चप्पल न घालण्यास सुरुवात केली आणि मौन व्रत घेतले.

उत्तर प्रदेशातील अमेठी येथील 'मौनी स्वामी' यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी ३७ वर्षात ५६ वेळा भूमी समाधी घेतली. सागर आश्रमाचे अध्यक्ष अभय चैतन्य ब्रह्मचारी शिवयोगी (मौनी स्वामी) यांनी १९८१ ते २०२३ या काळात राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक यज्ञ याग त्यांनी केले आहेत. स्वामीजींनी १९८९ - २००० साली त्यांनी मौन व्रत घेतले होते. आणि नेपाळमध्येही त्यांनी ४१ दिवस भूमी समाधी घेतली होती.

हजारीबाग, झारखंड येथील ८५ वर्षीय महिला सरस्वती देवी (मौनी माता) जी यांनी २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तीन दशकांपासून म्हणजे (30 वर्षांपासून) सुरू असलेले 'मौन व्रत' त्यांनी मोडले. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा मौनी माताजींनी अयोध्येत राम मंदिर होईपर्यंत मौन बाळगण्याची शपथ घेतली होती.

मुघल आक्रमकांनी राम मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर अयोध्येतील सरायरासी, सिसिंदा, सानेथू, भिटी, सराव, हंसवार, मकरही आदी १५० गावांतील दीड लाख ग्रामस्थांनी पगडी आणि चामड्याचे जोडे न घालण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिल्यानंतर शेवटी ५०० वर्षांनंतर या लोकांनी पगडी घातली आणि चामड्याच्या वस्तू वापरायला सुरुवात केली.

उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे वृद्धाश्रम चालवणारे सत्यदेव शर्मा यांनी २१ वर्षांपूर्वी प्रतिज्ञा घेतली होती. अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जाणार नाही तोपर्यंत तो अन्न ग्रहण करणार नाही अर्थात त्यांनी अन्नत्याग केला होता. २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत 'प्राण प्रतिष्ठा' कार्यक्रमानंतर त्यांनी भोजन केले.

राजस्थान येथील श्रीगंगानगर येथील रहिवासी गोपाल गुप्ता हे 33 वर्षांपासून भगवान श्री रामजींची वाट पाहत होते. त्यांनी केस न कापण्याचे व्रत घेतले आणि आजपर्यंत त्यांनी पाळले. कारसेवक म्हणून राममंदिर आंदोलना दरम्यान त्यांनी तशी शपथ घेतली होती अयोध्येत जोवर मंदिर होत नाही त्यांनी केस कापले नाही आणि दाढीसुद्धा केली नाही .

उत्तर प्रदेशातील खगरा येथील रहिवासी देव दास यांनी राम मंदिर आंदोलनावेळी जेव्हा भगवान श्रीराम एका छोट्या झोपडीत विराजमान आहेत हे पाहून त्यांनी त्याच क्षणी चप्पल घालणे बंद केले. आणि तिथेच त्यांनी शपथ घेतली की जेव्हा राम मंदिर पूर्ण होईल आणि ते तयार झाल्यावरच ते अयोध्येला जातील आणि त्यानंतर त्यांनी चप्पल घालायला सुरुवात केली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातील कारसेवक रवींद्र गुप्ता, अर्थात भोजपाली बाबा) जी १९९२ मध्ये २१ वर्षांचे होते. कारसेवेसाठी अयोध्येला आले आणि त्यांनी आंदोलना दरम्यान जोपर्यंत भव्य राम मंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. रवींद्र गुप्ता अर्थात भोजपाली बाबा, यांनी फिलॉसॉफीमध्ये एम.ए आणि कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील खैरा गावचे रहिवासी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा यांनी ३१ वर्षांपासून अन्नत्याग केला होता. आतापर्यंत ते फक्त फळे खात होते. ७ डिसेंबर १९९२ रोजी त्यांनी संकल्प केला होता की मंदिर जोवर होत नाही तोपर्यंत ते फक्त फळांवर जगतील. बैठा बाबा यांनी लग्नही केलं नाही, फक्त समाजासाठी आयुष्य समर्पित केलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत.

पंजाब मधील मोहाली सेक्टर-६८ मधील ८९ वर्षीय दौलतराम, यांनी ३१ वर्ष चहा घेतला नाही. १ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत गेल्यावर तेथील वातावरण बघून त्यांच्या मनात त्यागाची भावना निर्माण झाली आणि त्यांनी चहा न घेण्याची शपथ घेतली होती.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये 88 वर्षीय उर्मिला चतुर्वेदी गेली 28 वर्षांपासून राम मंदिर उभारणीची वाट पाहत होत्या आणि त्यांनी त्यासाठी अन्नत्याग केला होता. उर्मिलाजी फक्त फळे आणि पाणी घेत असत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांनी अन्नग्रहण केले.