आश्चर्याचा धक्का देणारे वाहतुकीचे 'हे' चार नियम; ज्यामुळे दंडाची पावती भरावी लागेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 08:57 AM2019-09-15T08:57:49+5:302019-09-15T09:04:40+5:30

वाहतुकीचे नवीन नियम केंद्र सरकारने लागू केले आहेत. मात्र, महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी अद्याप ते अंमलात आणलेले नाहीत. तर काही राज्यांनी ते नियम अंमलात आणलेत. यामुळे पाच दहा हजार नव्हे तर तब्बल 6 लाखांपर्यंतचा दंड आकारल्याने खळबळ उडाली आहे. अशातच वाहनचालक नियमांपासून अनभिज्ञ आहेत.

नियम माहित नसल्याने अनेकदा वाहतूक पोलिसांशी बाचाबाची होते किंवा अनेकदा वाहतूक पोलिस चिरिमिरीसाठी कांगावा करत असल्याचे वाटते.

हॅल्मेट, सीटबेल्ट, गाडीच्या लाईट, इंडिकेटर, पीयुसी, इन्शुरन्स आदी गोष्टी या जुन्याच आहेत. मात्र, असे काही नवीन-जुने नियम आहेत. जे आपण सर्रास तोडतो, आणि पोलिसांनीही गांभिर्याने न घेतल्याने ते कधी प्रकाशात आलेले नाहीत.

नवे नियम लागू झाल्याने पोलिसांच्या हाती आता मोबाईल कॅमेरा, पावती फाडण्याची मशीन आली आहे. यामुळे हे नियमही आता प्रकाशात येऊ लागले आहेत.

नवीन मोटर वाहन कायद्यानुसार 4 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या मुलाला हेल्मेट घालावे लागणार आहे. अन्यथा 1000 रुपयांचा दंड होईल. तसेच कारमध्ये लहान मुलांसाठी विशिष्ट सीट बाजारात मिळते. ही सीट घ्यावी लागणार आहे आणि त्यामध्ये मुलाला बसवावे लागणार आहे.

आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, पण हे खरे आहे. गिअरवाली दुचाकी चालविताना चप्पल किंवा सँडल घातले असतील तर तो गुन्हा आहे. हा जुना नियम आहे. पण आता त्यावरून धूळ उठली आहे. यासाठी 1000 रुपयांचा दंड आकारला जातो. चप्पल किंवा सँडलमुळे गिअर बदलण्यास समस्या येते. यामुळे अपघाताची शक्यता असते.

वाहन चालविताना जर एखादा वाहन चालक लुंगी आणि बनियानवर असेल त्याला 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हाही नियम पहिल्यापासून होता. मात्र, नवीन कायदा लागू झाल्यापासून हा नियम पुन्हा चर्चेत आला आहे. लुंगीमुळे अपघात होण्याचा धोका असतो.

वाहनाची काच साफ केलेली नसल्यास किंवा तडे गेलेली असल्यास दंडाची पावती फाडावी लागू शकते. काचेवर धूळ असल्याने आजुबाजुचे पाहू शकत नाही किंवा दृष्यमानता कमी होते. यामुळे अपघात होऊ शकतो.

काच तडा गेलेली असल्यास त्यामुळेही वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताची शक्यता असते. यामुळे जर काच खराब झालेली असल्यास ती लवकरच बदलून घ्यावी.