सावधान...! वाहतुकीचे नियम मोडण्याऱ्यांचे 'स्वातंत्र्य' संपले; आधी दहापट विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:33 PM2019-08-15T14:33:07+5:302019-08-15T14:42:39+5:30

मोटार वाहन सुधारणा विधेयक 2019 लोकसभेसह राज्यसभेतही संमत झाले आहे. या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही स्वाक्षरी केली आहे. यामुळे अवघा देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आजपासून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांचे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे 'स्वातंत्र्य' संपुष्टात येणार आहे.

हे सुधारणा विधेयक १५ ऑगस्टपासून लागू झाले आहे. यामुळे आजपासून वाहतुकीचे नियम मोडताना किमान दहादा विचार करावा लागणार आहे. कारण नव्या नियमांनुसार दंडच दहा पटींनी वाढविलेला आहे.

आपत्कालीन गाड्या किंवा अँम्बुलन्सला वाट न दिल्यास 10 हजाराचा दंड होऊ शकतो. तसेच लायसन्सही रद्द होऊनही वाहन चालवत असल्यास 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. अशाप्रकारच्या दंडाची यादीच आम्ही बनविली आहे. यामुळे सावधपणे वाहन चालवा, नियम मोडू नका.

लायसन नसताना जर कोणी वाहन चालवित असेल तर त्याला 500 ऐवजी 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

लायसन निलंबित झाले असल्यावरही वाहन चालवत असेल तर 10 हजारांचा दंड झाला आहे. आधी हा दंड 500 रुपये होता.

अल्पवयीन वाहन चालवत असल्यास वाहन मालकाला किंवा त्याच्या आई-वडीलांना 25 हजार रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या शिवाय अल्पवयीन मुलावर खटला चालविला जाणार.

जर कोणी अतिवेगात वाहन चालवित असल्यास त्याला 400 ऐवजी 1000 ते 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

रॅश ड्रायव्हिंग म्हणजेच कोण्याच्या जीवाला धोका उत्पन्न होईल असे वाहन चालविल्यास 1 हजार ऐवजी 5000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

ड्रंक अँड ड्राईव्हचे चलन आता 2 हजार रुपयांवरून 10 हजार रुपये झाले आहे.

सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपयांऐवजी 1000 रुपयांचा दंड.

रेड सिग्नल तोडल्यास किंवा मोबाईलवर बोलल्यास 500 रुपयांचा दंडी आणि 1 वर्षाची शिक्षा. आधी 100 रुपये होता.

दुचाकीवर दोन पेक्षा अधिक लोकांना बसविल्यास 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकते.

विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास 100 रुपयांवरून 1000 रुपयांचा दंड. तसेच 4 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठीही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

बिना इन्शुरन्स वाहन चालविल्यास 1000 रुपयांऐवजी 2 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

प्रवासी कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यास प्रती प्रवासी 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.