विद्युत वाहिन्यांच्या घर्षणातून ठिणगी पडल्याने दोन एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:21 IST2019-05-28T13:21:27+5:302019-05-28T13:21:54+5:30
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे.

विद्युत वाहिन्यांच्या घर्षणातून ठिणगी पडल्याने दोन एकर ऊस जळाला
पालम (परभणी ) : तालुक्यातील आरखेड शिवारात वीजतारा एकमेकांना स्पर्श होऊन दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळी नऊ वाजता घडली. यामुळे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे.
आरखेड शिवारात सखाराम नरहरी दुधाटे व दत्ता सखाराम दुधाटे यांच्या कुटुंबाची शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये दोन एकरात त्यांनी उसाची लागवड केली होती. ऊसावर खत व मशागतीसाठी त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. तसेच दुष्काळ असतानाही विकतचे पाणी घेऊन पिक जगवले. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतातून लोंबकळत गेलेल्या विद्युत वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली. शेतातील पाचट यामुळे पेटली, काही वेळातच आग संपूर्ण शेतात पसरली. ऊस जळल्याने शेतकऱ्याचे जवळपास २ लाखांचे नुकसान झाले आहे. दुष्काळात मेहनत पूर्वक पोसलेले पिक हातचे गेल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने हे संकट ओढवले असल्याचा आरोप करत तातडीने उसाचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.