राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेल्या योजनेंतर्गत नवीन विहीर घेण्यासाठी अडीच लाख रुपये, जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी ५० हजार, इनवेल बोअरिंगसाठी २० हजार रुपये, पंप संचसाठी २५ हजार रुपये, वीज जोडणी आकारसाठी १० हजार रुपये आणि शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यासाठी एक लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यानुसार परभणी जिल्ह्याला २०२१-२२ या वर्षाकरिता ७ कोटी रुपये देण्याची तरतूद मंजूर करण्यात आली होती. त्यातील ६० टक्के म्हणजेच ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश २२ जुलै रोजी राज्याच्या कृषी विभागाने काढले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेला लाभार्थ्यांची निवड करावी लागणार आहे. यासाठी संबंधितांकडून कधी अर्ज मागून घेतले जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सव्वाचार कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:12 AM