मानवत (परभणी ) : मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधीत झालेल्या क्षेत्राच्या अनुदानापोटी ८ कोटी रुपयाचा दुसरा हप्ता तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे. याचा लाभ ३३ गावातील शेतकऱ्यांना मिळेल.
गेल्या वर्षी खरीप हंगामात कापुस पिकावर मोठ्याप्रमाणावर बोंडअळीचा पादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे कापसाचे उत्पादन मिळाले नव्हते. त्यानंतर शासनाने बोंडअळीमुळे पादुर्भाव झालेल्या क्षेत्रासाठी अनुदान मंजुर केले. मानवत तालुक्यातील तहसील व कृषी कार्यालयाच्या वतीने २९ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करुन ३७ हजार ६२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
यावरून शासनाने पहिल्या टप्यात ५ कोटी ३२ लाख ९१ हजार रुपायाची रक्कम तहसील कार्यालयाकडे वर्ग केली. ही रक्कम तालुक्यातील २० गावातील शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली. यानंतर शासनाने ८ कोटी रुपयाचा दुसरा हप्ता तहसील कार्यालयाकडे वर्ग केला आहे. यातून उर्वरित ३३ गावांमधील शेतकऱ्यांना ही रक्कम प्रदान करण्यात येईल.
रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळेल दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे. लवकरच ती बॅंकाकडे वर्ग करुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल - निलम बाफना, तहसीलदार