ध्यये निश्चित ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:47+5:302021-03-29T04:11:47+5:30
परभणी : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय निश्चित ठेवून तयार करावी, योग्यरित्या नियोजन केले तर केलेल्या तयारीस यश प्राप्त ...
परभणी : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय निश्चित ठेवून तयार करावी, योग्यरित्या नियोजन केले तर केलेल्या तयारीस यश प्राप्त होते, असे प्रतिपादन आचार्य एन.जी. रंगा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रतापकुमार रेड्डी यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभाग व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या वतीने मागासवर्गीय पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी २६ व २७ मार्च रोजी मार्गदर्शन प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डॉ. प्रतापकुमार रेड्डी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी.एस. जाधव, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना कृषी संशोधनाशी संबंधित असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, या बाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, अभ्यासवर्गाचे आयोजन झाले पाहिजे. नावाजलेल्या संस्थेस व विद्यापीठांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी विद्यापीठ प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आय.ए.बी. मिर्झा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ज्योती गायकवाड यांनी आभार मानले.
या तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठातील डॉ. आय.ए.बी. मिर्झा, तिरुपाथूर येथील डॉ. एम.जगदीश, जोधपूर येथील कृषी संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. मुला राम, कानपूर येथील शास्त्रज्ञ डाॅ. कांचेती मृणालिनी आदींनी मार्गदर्शन केले.