प्राथमिक अंदाजात केवळ ८ हजार हेक्टरवरील नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:22 AM2021-09-15T04:22:50+5:302021-09-15T04:22:50+5:30
पालम तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होऊन सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला होता. त्यात तालुक्यातील शेती ...
पालम तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होऊन सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला होता. त्यात तालुक्यातील शेती पिकांचे सर्वत्र नुकसान झाले. बहुतांश ठिकाणी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. त्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज नेहमीप्रमाणे महसूलकडून कृषी विभागाने घेतला. तो पाहताच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तालुक्याच्या एकूण ४२ हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पिके आहेत. ती पुरामुळे नेस्तनाबूत झाली असताना, हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच क्षेत्राचे नुकसान नमूद करण्यात आले. हा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासन सांगत असले तरी, पुढे त्यात मोठी वाढ होईल की नाही, हे सांगता येत नाही. मागील १३ ऑगस्ट रोजी तालुक्यात आलेल्या पुराच्या नुकसानीत ५ हजार ५०० हेक्टर नमूद आहे. मागीलवेळचे नुकसान कमी दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे कमी असताना, तालुक्यातील रावराजूर आणि पेठशिवणी महसूल मंडल पीक विम्याच्या अग्रीम रकमेपासून वगळण्यात आले आहे. त्यातच ९ सप्टेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयाने तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. तरी देखील त्याच विभागाकडून नुकसान कमी दाखविल्याने संताप व्यक्त होत आहे.
कृषी अधिकारी फोन स्वीकारेनात
पालम तालुक्यातील या नुकसानीच्या क्षेत्राबद्दल विचारण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांना फोन केला असता, त्यांनी स्वीकारला नाही. वारंवार प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयात देखील नव्हते.
पालम तालुक्यातील नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत. ते संपल्यानंतर क्षेत्रात बदल होऊ शकतो. हे नुकसानीचे क्षेत्र अंतिम नाही.
- प्रतिभा गोरे, तहसीलदार, पालम.