परभणीत आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या चौघांना पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:33 IST2018-02-20T17:32:07+5:302018-02-20T17:33:58+5:30
विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या चौघांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

परभणीत आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या चौघांना पोलिसांनी पकडले
परभणी - विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या चौघांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांपैकी दोघांच्या ताब्यातून रॉकेलचा डबाही जप्त करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी अ व ब च्या दोन चेअरमन आणि संचालकांविरुद्ध अनेक वेळा उपोषण केल्यानंतरही कारवाई होत नाही. चेअरमन, संचालकांविरुद्ध ठोस पुरावे असतानाही कारवाई होत नसल्याने रावण बाबाराव मोहिते, कैलास चंपतराव वाघ, मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते या चौघांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन कारवाई न झाल्यास २० फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
या इशार्यानुसार मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवा मोंढा पोलीस ठाणे आणि चुडावा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यांनी तगडा बंदोबस्त लावला. सकाळपासूनच पोलीस कर्मचारी या भागात इशारा देणार्या चौघांचाही शोध घेत होते. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मारोती देवराव मोहिते आणि नरहरी सीताराम मोहिते हे दोघेही रॉकेलचा डबा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी लगेच या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील रॉकेलचा डबाही हिसकावून घेतला. चुडावा पोलीस ठाण्याचे शेख रफीक, एल.बी. पोकलवार, एन.ए.सुजलोड, राहुल चिंचाणे, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू, संतोष चाटे, कैलास बायनावाड, पी.व्ही. दीपक यांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर उर्वरित दोघांचा शोध घेण्यात आला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रावण बाबाराव मोहिते आणि कैलास चंपतराव वाघ हे दोघेही पोलिसांना आढळले. मोबाईल ट्रॅकिंगच्या माध्यमातून पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे.
आश्वासनानंतर प्रकरण निवळले
दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या आंदोलकांसह इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांची भेट घेतली. या प्रकरणात २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक आणि लेखाधिकार्यांची संयुक्त बैठक घेऊन तोगडा काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिल्यानंतर प्रकरण निवळले.