परभणी : संघर्ष समितीचा पाण्यासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:29 IST2019-05-19T00:28:57+5:302019-05-19T00:29:13+5:30
लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.

परभणी : संघर्ष समितीचा पाण्यासाठी रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.
यावर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. यामुळे तालुक्यात पाणीपातळी खालावली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुधना प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना तालुक्यासाठी पाणी आवर्तन सोडले जात नाही. यामुळे तालुक्यातील गोगलगाव, सावंगी मगर, इरळद, मंगरुळ, नरळद, टाकळी नीलवर्ण, कोथाळा, राजुरा, शेवडी जहांगीर व पार्डी या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दुधना काठावरील या ११ गावातील ग्रामस्थांनी बैलगाडीसह मानवतरोड येथे रास्तारोको केला. ११.३० ते १२.१५ या वेळेत हे आंदोलन सुरु होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माजी मंत्री सुरेश वरपूडकर, लिंबाजी कचरे, अशोक बुरखुंडे, बाळासाहेब आळणे, दीपक लिपने यांची भाषणे झाली. संघर्ष समितीचे बाळासाहेब आळणे, लिंबाजी कचरे, भगवान मुळे, संजय देशमुख, अण्णासाहेब मगर, दत्तराव मगर, सुभाष देशमुख, रामराजे महाडिक, रमेश कदम, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशोर कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकुल वांघुडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर, शिवशंकर मन्नाळे, नागनाथ कुकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलकांवर गुन्हे दाखल
दुधना नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग अडविणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे ही कारणे देऊन पोलिसांनी २२ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशन कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामराजे महाडिक, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते, शिवशंकर पाते, अण्णासाहेब मगर या आंदोलकांचा समावेश आहे. आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.