परभणी : पाणीपुरवठा चाचण्यांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:27 AM2019-12-26T00:27:23+5:302019-12-26T00:27:44+5:30

शहर पाणीपुरवठा योजनेच्या अंतीम टप्प्याला सुरुवात झाली असून, त्यात शहरांतर्गत असणाऱ्या २ एमबीआरची (मुख्य जलकुभांची) प्रत्यक्ष चाचणी गुरुवारपासून घेतली जाणार आहे़ त्यामुळे शहरांतर्गत या योजनेच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर शहरवासियांना येलदरीचे पाणी लवकरच मिळण्याची आशा निर्माण झाली आहे़

Parbhani: Start of water supply tests | परभणी : पाणीपुरवठा चाचण्यांना प्रारंभ

परभणी : पाणीपुरवठा चाचण्यांना प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहर पाणीपुरवठा योजनेच्या अंतीम टप्प्याला सुरुवात झाली असून, त्यात शहरांतर्गत असणाऱ्या २ एमबीआरची (मुख्य जलकुभांची) प्रत्यक्ष चाचणी गुरुवारपासून घेतली जाणार आहे़ त्यामुळे शहरांतर्गत या योजनेच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर शहरवासियांना येलदरीचे पाणी लवकरच मिळण्याची आशा निर्माण झाली आहे़
परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून शहरासाठी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत येलदरी येथून पाणीपुरवठा योजनेला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती़ मात्र ही योजना अनेक वर्षे रखडली होती़ दोन वर्षापूर्वी अमृत योजनेंतर्गत या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर योजनेचे काम मार्गी लागले आहे़ येलदरी येथे उद्भव विहीर, येलदरी ते धर्मापुरी जलवाहिनी, धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प, शहरातील १२ जलकुंभ, दोन मोठे एमबीआर आणि शहरात जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे़ त्यामुळे येलदरी येथून शहराला पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे़ महिनाभरापूर्वी येलदरी धरणातील पाणी प्रत्यक्ष जलवाहिनीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रात पोहचले़ त्यामुळे लवकरच हे पाणी परभणी शहरातही दाखल होणार आहे़ शहरातील सर्व कामे पूर्ण झाली असून, या कामांची आता चाचणी घेणे शिल्लक आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात उभारण्यात आलेल्या एमबीआर, जलकुंभ आणि जलवाहिन्यांची चाचणी टप्प्या टप्प्याने घेतली जाणार आहे़ त्याची सुरुवात गुरुवारपासून होणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण केंद्रापासून ते परभणी शहरातील एमबीआरपर्यंत पाणी सोडले जाणार आहे़ शहरातील खाजा कॉलनी आणि विद्यानगर येथे एमबीआर उभारण्यात आले असून, या चाचणीच्या माध्यमातून दोन मोठ्या एमबीआरसह जलशुद्धीकरण प्रकल्प ते एमबीआरपर्यंतच्या जलवाहिनीचीही चाचणी घेतली जाणार आहे़ यासाठी साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे़ ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर एमबीआरपासून ते शहराच्या वेगवेगळ्या भागात उभारण्यात आलेल्या जलकुंभामध्ये पाणी सोडले जाणार आहे़ त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता शहरांतर्गत पाण्याच्या चाचण्या घेतल्या जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यासाठी ही योजना सज्ज होणार आहे़
चाचण्यांसाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी
४जलशुद्धीकरण प्रकल्पातून प्रथमच येलदरीचे पाणी परभणी शहरात दाखल होणार आहे़ या पाण्याची टप्प्या टप्प्याने चाचणी घेतली जाणार असून, त्यासाठी साधारणत: १५ ते २० दिवसांचा कालावधी लागेल, अशी अपेक्षा आहे़
४विद्यानगर आणि खाजा कॉलनी येथील एमबीआरची चाचणी यशस्वी झाल्यानंतर एमबीआरपासून ते ईसीआरपर्यंत (जलकुंभापर्यंत) पाणी सोडून चाचणी घेतली जणार आहे़ या योजनेंतर्गत शहरात १२ जलकुंभ उभारण्यात आले आहेत़ या प्रत्येक जलकुंभाची स्वतंत्र चाचणी घेतली जाणार आहे़
४ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्व जलवाहिनीची चाचणी होणार आहे़ शहरात जलवाहिनीचे असलेले लिकेज, उभारण्यात आलेल्या व्हॉल्व्हचे टायमिंग सेट करणे आदी चाचण्या होणार असून, त्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष नळाद्वारे पाणी देण्यासाठी ही योजना सज्ज होणार आहे़
जलशुद्धीकरण केंद्रापासून परभणी शहरातील एमबीआरपर्यंत पाणी घेण्याची चाचणी गुरुवारपासून घेतली जाणार आहे़ ही चाचणी टप्प्या टप्प्याने होणार आहे़ तांत्रिक दृष्टीने सर्व बाबी पूर्ण करीत पाणी एमबीआरमध्ये आणले जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात दोन्ही एमबीआर एक मीटरपर्यंत पाणी भरून घेतले जाणार असून, त्यानंतर ठराविक अंतराने एमबीआर भरले जणार आहेत़ शहरांतर्गत चाचण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागू शकतो; परंतु, सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून घेतल्यानंतरच प्रत्यक्ष योजनेला सुरुवात केली जाणार आहे़
-रमेश पवार, आयुक्त, मनपा

Web Title: Parbhani: Start of water supply tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.