परभणी : टंचाई निवारणासाठी ५३९ विहिरींचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:42 IST2019-09-25T00:41:44+5:302019-09-25T00:42:12+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़

परभणी : टंचाई निवारणासाठी ५३९ विहिरींचे प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़
उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते़ टंचाई कालावधीत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ त्यावर लाखो रुपयांचा खर्च होतो़ दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवते़ त्यावर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी, टंचाईग्रस्त गावाला गावातच पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी ग्रामपंचायतस्तरावर गावातील सार्वजनिक जागेत विहीर घेण्याची योजना आखली आहे़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात या योजनेला प्रारंभ झाला असून, ग्रामपंचायतींकडून सार्वजनिक विहिरींसाठी प्रस्ताव मागविले जात आहेत़ २२ सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला ५३९ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी १६९ प्रस्तावांना आॅनलाईन वर्ककोड देण्यात आला आहे़ तालुकास्तरीय समितीने ३९२ प्रस्तावांना मान्यता दिली असून, जिल्हास्तरीय समितीने त्यातील ३८७ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे़ त्यापैकी १४३ गावांमध्ये सार्वजनिक विहीर घेण्याचे काम सुरू झाले आहे़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत़ गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतल्याने त्या गावातील पाणीटंचाई दूर होणार असून, या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये ग्रामवासियांना पाणी उपलब्ध होणार आहे़