परभणी : ‘जलयुक्त’ला उदासिनतेचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:57 IST2019-07-28T23:56:26+5:302019-07-28T23:57:05+5:30
राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात ५८२ गावांमध्ये कामे प्रस्तावित करण्यात आली़ ४ टप्प्यात राबविलेल्या या योजनेत २१८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, प्रत्यक्षात वर्षनिहाय ८३ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ १० हजार ९०७ कामे प्रस्तावित केली होती़ त्यापैकी ८ हजार ४५७ कामे पूर्ण झाली आहेत़ अनेक कामे अजूनही रखडल्याने योजनेला उदासिनतेचा फटका बसला आहे़

परभणी : ‘जलयुक्त’ला उदासिनतेचा फटका !
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात ५८२ गावांमध्ये कामे प्रस्तावित करण्यात आली़ ४ टप्प्यात राबविलेल्या या योजनेत २१८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, प्रत्यक्षात वर्षनिहाय ८३ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ १० हजार ९०७ कामे प्रस्तावित केली होती़ त्यापैकी ८ हजार ४५७ कामे पूर्ण झाली आहेत़ अनेक कामे अजूनही रखडल्याने योजनेला उदासिनतेचा फटका बसला आहे़
सिमेंट नाला कामात दगडांचा वापर
जिंतूर तालुक्यातील मांडवा येथे सिमेंट नाला बांध कामामध्ये दगडांचा वापर केल्याची बाब तपासणीत उघड झाली़ त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे़ या कामासाठी ४० लाख ९ हजार ४१९ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; परंतु, कामात मात्र मोठे दगड वापरण्यात आले़ तसेच निकृष्ट दर्जाची वाळू वापरली़ परिणामी या सिमेंट नाला बांधात पाणी अडण्याची शक्यता कमी झाली असून, कामातील गैरप्रकार उघड पडला आहे़
जलयुक्त शिवारकामे
जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअर
दुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कामे गतीने पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक विभागाच्या अंतर्गत कामांच्या निविदा काढून काम करण्याचे आदेश दिले. काही भागात स्थानिक वादामुळे रखडलेली कामे वाद मिटवून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला़
-विजयकुमार पाटील
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
आमच्या गावात १ कोटी २० लाख रुपयांची ६ बंधारे बांधण्यात आली़ मात्र ही सर्व बंधारे बोगस झाली़ अनेक बंधाऱ्यांना तडे गेले आहेत़ पाणी साचून राहत नाही़ या विषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती़ चौकशी अंती हे बंधारे बोगस असल्याचे स्पष्ट झाले़
- श्रीकांत देवडे, साडेगाव