Parabhani: रस्ता नसल्याने गरोदर मातेची बैलगाडीतून फरफट; 'आई वाचली, पण बाळ दगावले!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:39 IST2026-01-30T12:39:01+5:302026-01-30T12:39:28+5:30
स्वातंत्र्यापासून रस्ता नाही, सेलू तालुक्यातील बोथ तांडा येथील प्रकार

Parabhani: रस्ता नसल्याने गरोदर मातेची बैलगाडीतून फरफट; 'आई वाचली, पण बाळ दगावले!'
सेलू (जि. परभणी) : देशास स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष लोटले तरी अनेक गावांना रस्ता नाही. याला प्रशासनाची अनास्था म्हणावी की, राज्यकर्त्यांचा निष्काळजीपणा. हा प्रश्न सेलू तालुक्यातील बोथ तांडा येथील घटनेमुळे पुन्हा एकदा पुढे आला आहे. रस्ता, पुलाअभावी प्रसूतीवेदनेत गरोदर महिलेला खस्ता खात बैलगाडीतून प्रवास करावा लागला. आरोग्य परिचारिकेच्या धैर्यामुळे त्या महिलेचे प्राण तर वाचले, पण बाळ दगावले. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
बोथ तांडा येथील कल्पना अमोल चव्हाण यांना गुरुवारी पहाटे प्रसूतीवेदना सुरू झाल्या. गावाला जोडणारा दीड किलोमीटर रस्ता नसल्याने ना कोणते वाहन गावात पोहचू शकते, ना रुग्णवाहिका. नाइलाजाने या महिलेस बैलगाडीने वाई गावापर्यंत नेले. तेथून खासगी वाहनाने राव्हा आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. उपकेंद्रातील आरोग्य परिचारिका सुजाता गायकवाड यांनी तत्काळ उपचार सुरू केले. बाळाभोवतीचे पाणी निघून गेले होते, तर अल्ट्रासाउंडमध्ये बाळाचे हृदय थांबलेले आढळले. तरीही धैर्याने परिचारिका गायकवाड यांनी प्रसूती करून कल्पना चव्हाण यांचे प्राण वाचवले. मात्र, गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. आणखीन काही मिनिटांचा उशीर झाला असता तर आईचेही प्राण धोक्यात आले असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. नऊ महिने आईच्या उदरात सुरक्षित असलेले बाळ मात्र व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे दगावले. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदन, मागण्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
बोथ आणि बोथ तांडामध्ये सुमारे तेराशे लोकसंख्या असून, ५३० मतदार आहेत. करपरा नदीवर पूल आणि गावाला जोडणारा दीड किमी रस्ता स्वातंत्र्य काळापासूनच झालाच नाही. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांत जि. प., आमदार, खासदारांसह पालकमंत्र्यांनाही अनेकदा निवेदन देऊन मागणी केली, पण याचा उपयोग झाला नाही, असे सचिन राठोड यांनी सांगितले.
रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता
बोथ व बोथ तांडा गाव चिकलठाणा बु. गट व गणात येते. येथील निडणुकीत ग्रामस्थांनी एकत्र येऊन बहिष्कार टाकल्या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना या घटनेपूर्वीच दिले होते. या घटनेमुळे आता गावात शोककळा पसरली असून, संतापाची लाट उसळली आहे.