Parabhani: पाथरीत भटक्या कुत्र्यांची दहशत, प्रशासन सुस्त! ६ चिमुरड्यांचे तोडले लचके
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:06 IST2026-01-19T17:04:19+5:302026-01-19T17:06:33+5:30
संतप्त नागरिकांचा २३ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा

Parabhani: पाथरीत भटक्या कुत्र्यांची दहशत, प्रशासन सुस्त! ६ चिमुरड्यांचे तोडले लचके
पाथरी (परभणी): पाथरी शहरातील एकता नगर भागात १८ जानेवारी रोजी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः तांडव घातले. रस्त्यावर खेळणाऱ्या सहा लहान मुलांवर या कुत्र्याने अचानक हल्ला चढवून त्यांच्या हाता-पायांचे लचके तोडले. या भीषण हल्ल्यात मुले रक्तबंबाळ झाली असून, त्यांना तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पाथरी शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. केवळ एकता नगरमधील ही घटना नसून, गेल्या १२ दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल १२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. रस्त्यावरून चालताना वृद्ध, महिला आणि शाळकरी मुले भीतीच्या सावटाखाली आहेत. कुत्र्यांमुळे दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांच्या मते, नगरपालिकेकडून केली जाणारी निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहीम केवळ कागदावरच आहे.
कुत्र्यांची दहशत, प्रशासन सुस्त!
या वाढत्या दहशतीच्या निषेधार्थ समाजसेवक खादीर बापू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "एखाद्याचा जीव गेल्यावरच नगरपालिकेला जाग येणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. २३ जानेवारीपर्यंत कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी सांगितले की, "येत्या तीन दिवसांत शहरातील भटके कुत्रे पकडण्याची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. जे कुत्रे अधिक त्रासदायक आणि हिंसक आहेत, त्यांचा बंदोबस्त तातडीने केला जाईल." मात्र, वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांमुळे नागरिक आता केवळ ठोस कारवाईची प्रतीक्षा करत आहेत.