जिल्हा कचेरी वाहनांची गर्दी हटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:47+5:302021-03-25T04:17:47+5:30
शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण ...

जिल्हा कचेरी वाहनांची गर्दी हटली
शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. नानलपेठ कॉर्नरपासून ते शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता एकेरी वाहतुकीचा असताना या मार्गावर दुहेरी वाहतूक होत आहे. वाहतूक शाखेकडून मात्र नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक समस्या वाढत आहेत.
ग्रामीण भागात विजेचा समस्या वाढल्या
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषत: कृषिपंपांना दिली जाणारी वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही पिकांना देणे पाणी शक्य होत नाही. त्यामुळे महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.
नाट्यगृहाचे काम प्रगतिपथावर
परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियमसमोरील बचत भवनच्या जागेत नवीन नाट्यगृह उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. तळमजला आणि त्यावरील दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून, सध्या तिसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू आहे. हे काम येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
पीकविम्याचा प्रश्न रखडलेला
परभणी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा अजूनही कंपनीने शेतकऱ्यांना परत केला नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, प्रशासन इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करूनही शेतकऱ्यांना विमा परताव्यापासून वंचित रहावे लागत आहे. कृषी विभागाने विमा कंपनीकडे पाठपुरावा करून मदत मिळवून द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था
परभणी : शहरातील सुपरमार्केट ते मोठा मारुती मंदिर या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, कारेगाव रोड भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांसाठी हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. मनपाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
परभणी : पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना मात्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीने थकबाकीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला असून, पाणीपुरवठा योजना ठप्प आहेत. त्यामुळे शेतशिवारातून पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.