कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक, घराघरात वाढली चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:51+5:302021-07-24T04:12:51+5:30
शहरासह जिल्ह्यात मार्च २०२० नंतर कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहने तसेच ऑटो, बस, रेल्वे ही प्रवासी साधने ...
शहरासह जिल्ह्यात मार्च २०२० नंतर कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहने तसेच ऑटो, बस, रेल्वे ही प्रवासी साधने काही महिन्यांसाठी बंद होती. यामुळे अत्यवश्यक कामासाठी ये-जा करण्यास तसेच परगावी जाण्यास अनेकांना अडथळा निर्माण होत होता. तसेच सामाजिक अंतर पाळणे व कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे, यासाठी खासगी प्रवासी वाहनाने ये-जा करण्यास नापसंती दर्शविली. यासोबतच राज्य शासनाने विविध प्रवासी वाहनांना कोरोना काळात कमी प्रवासी संख्येचे निर्बंंध लावले होते. याचा फटका ऑटोचालकांच्या व्यवसायावर झाला. मात्र, या काळात अनेक नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षित प्रवासासाठी वाहन खरेदी करण्यास पसंती दिली.
ऑटोचालक-टँक्सीचालक परेशान
कोरोनापुर्वी स्वत:चा व्यवसाय म्हणून नवीन ऑटो कर्ज काढून खरेदी केला. यानंतर मागील वर्षभरात सतत लाँकडाऊन आणि शासनाचे निर्बंध यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. यातच आहे ते कर्ज फेडणे आणि घर चालवणे यासाठी अडचण निर्माण झाली. यात शासनाची मदतही मिळाली नाही. - राजू लोकडे.
एरव्ही शाळा सुरु असल्याने विद्यार्थी ने-आण करण्यातून व्यवसाय होत होता. यानंतर मग उर्वरित वेळ शहरात वेगवेगळ्या भागात मिळेल ते भाडे घेऊन जात होतो. मात्र, शाळा बंद तर नागरिक दवाखान्याचे काम वगळता शक्यतो घराबाहेर पडत नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला. - शिवाजी आव्हाड.
म्हणून घेतली चारचाकी
घरातील सदस्यांची बाहेर ये-जा करताना अडचण होऊ नये. कुठेही जायचे तर सुरक्षित प्रवास करण्यासाठी स्वत:ची चारचाकी खरेदी केली. कोरोनामुळे रेल्वे वगळता आजही इतर वाहनांचा वापर करत नाही. - परिमल लांडगे.
कोरोनामुळे बाहेर खासगी प्रवासी वाहनातून ये-जा करताना कोण, कूठून आले आणि बसले याचा ताळमेळ नसतो. अनेक जण मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे असे प्रकार बिनधास्त करतात. यामुळे स्वत:ची चारचाकी खरेदी केली. - उपेंद्र विडोळकर.