ऑनलाईन लोकमत / विठल भिसे
पाथरी (जि. परभणी ), दि. 30 : रविवारी सुटी असतानाही पिक विमा भरण्यासाठी बँकासुरु होत्या. यामुळेच आज सकाळीच येथील जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची तोबा गर्दी उसळली. बँकेने शनिवारी (दि.२९) काही शेत-यांकडून पिक विम्याचे भरलेले फॉर्म घेऊन ठेवले होते, त्यांचा विमा भरणारे शेतकरी व आज फॉर्म घेऊन आलेले शेतकरी अशी एकच गर्दी सकाळी बँकेत झाली. शेत-यांची रेटारेटी वाढल्याने परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात होती. यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
या गोंधळावर सह पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी तोडगा काढत, कालचे आणि आजचे शेतकरी असे विभाजन केले. काल फॉर्म भरून दिलेले तब्बल ३०० शेतकरी आणि बँकेचे कॅशिअर यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन तिथेच काउंटर सुरू केले. यामुळे बँकेतील गर्दी कमी होऊन बँकेत फक्त आज आलेले शेतकरी राहिले. आज आलेल्या शेत-यांनी बँकेत तर काल फॉर्म दिलेल्या शेतक-याने पोलीस ठाण्यात असे विभाजन झाल्याने तणाव निवळा व सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.