कृषी पदवीधारकांचा परभणीत मोर्चा; रखडलेली पदभरती तत्काळ करण्याची मागणी
By मारोती जुंबडे | Updated: May 27, 2025 13:30 IST2025-05-27T13:29:40+5:302025-05-27T13:30:19+5:30
स्पर्धा मंचच्या वतीने मंगळवारी कृषी विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

कृषी पदवीधारकांचा परभणीत मोर्चा; रखडलेली पदभरती तत्काळ करण्याची मागणी
परभणी: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदभरती प्रक्रियेविरोधात कृषी पदवीधारकांनी एकत्र येत आज दुपारी १२ वाजता परभणीत जोरदार मोर्चा काढला. स्पर्धा मंचच्या वतीने कृषी विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
परभणी कृषी विद्यापीठात गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. अनेक वर्षांपासून कृषी विद्यापीठांमध्ये कोणतीही नवीन भरती न झाल्यामुळे हजारो पदवीधारक बेरोजगार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, कृषी आचार्य पदवीधारक आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना कोणतीही पात्रता परीक्षा न घेता थेट पीएच.डी. फेलोशिप देण्यात यावी. तसेच राज्यातील शालेय शिक्षणात कृषी विषय अनिवार्य करावा आणि तो शिकवण्यासाठी केवळ कृषी पदवीधारकांनाच पात्र मानावे, या मागण्यांचाही समावेश होता.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. इंद्र मणि आणि कुलसचिव संतोष वेणीकर यांच्याकडे सादर केले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, कृषी पदवीधारकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.