अतिवृष्टी झाली, तर ९१ गावांना धोका; ग्रामस्थांनाच घ्यावी लागणार काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:18 AM2021-07-28T04:18:25+5:302021-07-28T04:18:25+5:30
गोदावरी नदीकाठावरील ही गावे आहेत. त्यात खळी, झोला, धारखेड, मसला, गौंडगाव या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९१ गावे पूरबाधित ...
गोदावरी नदीकाठावरील ही गावे आहेत. त्यात खळी, झोला, धारखेड, मसला, गौंडगाव या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९१ गावे पूरबाधित असून, या गावांमध्ये हमखास पूर येतो. अतिवृष्टी काळात जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत.
का येतो पूर...
गंगाखेड तालुक्यातील खळी गावाचे पुनर्वसन झाले आहे. सुविधांअभावी समस्या आहेत. गोदावरी नदीकाठावरील झोला, गौंडगाव या गावांत वारंवार पुराचा फटका बसतो. धारखेड येथील छोटा पूल वाहून गेल्याने पुराचा फटका बसतो. अनेक भागात पुलाची कामे झाली नसल्याने पुराची समस्या निर्माण होते.
शहरातील पाणी साचणारी ठिकाणे
परभणी शहरातही पुराचे पाणी घुसत आहे. पिंगळगड नाल्याला पूर आल्याने वर्मानगर तसेच कारेगाव रोड भागातील सुंदराईनगर, विश्वासनगर, करीमनगर, गांधी पार्क, वसमत रोडवरील वसाहतींमध्ये आता पाणी साचू लागले आहे.
नाले सफाई न झाल्याने.....
शहरात यावर्षी नाल्यांची सफाई झाली नाही. त्यामुळे नाल्या तुंबून हे पाणी वसाहतींमध्ये शिरत आहे. कारेगाव रोड भागात कॅनाॅल परिसरातील वसाहतीत नेहमीच ही समस्या निर्माण होते. मात्र, महानगरपालिका कायमस्वरुपी तोडगा काढत नाही.
दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे गावाला जोडणारा रस्ता पाण्याखाली जात असून, गावाचा संपर्क शहराशी तुटतो. शिवाय या भागातील शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान दरवर्षीच होते. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यानंतर अंगावर काटा उभा टाकतो.
- नागरिकांच्या प्रतिक्रिया
आमच्या गावाशेजारून गोदावरी नदी वाहते. नदीपात्रातील वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे पात्राचा आकार बिघडला असून, अतिवृष्टी काळात पावसाचे पाणी शेतात आणि गावात शिरते. त्यामुळे दरवर्षीच पुराच्या पाण्यामुळे गावकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
- नागरिकांच्या प्रतिक्रिया