भांडले, म्हणून तरले! - कंगना रनोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:17 PM2018-01-04T12:17:13+5:302018-01-09T18:07:18+5:30

मुंबईत आले, तेव्हा मूर्ख होते मी. चिक्कार चुका केल्या. त्यांची वाट्टेल तेवढी किंमत मोजली. फुटपाथवर रात्री काढल्या. नंतर एका स्वस्तातल्या लेडीज होस्टेलमध्ये राहिले. मुंबई नावाच्या या समुद्रात नाकातोंडात पाणी जाऊ न देता मुंडकं वर ठेवून नुसतं तरंगत राहायचं झालं, तरी इथे आलेल्या कोणाही न्यू कमरला तीन गोष्टी लागतात - इंग्रजी, पैसे आणि कॉन्टॅक्ट. माझ्याकडे यातली एकही गोष्ट नव्हती. त्यात मी सुंदर नव्हते. असल्या हजारो पोरींकडे बघतपण नाही ही दुनिया... पण मी भांडायचं ठरवलं.

Kangana Ranaut on controversy | भांडले, म्हणून तरले! - कंगना रनोट

भांडले, म्हणून तरले! - कंगना रनोट

Next

- कंगना रनोट
भांबला हे माझं गाव. शहरच छोटं. तिथलं माझं कुटुंब. इतर इतकी कुटुंबं असतात तसंच. मी स्वभावाने जरा बंड होते. प्रश्नबिश्न विचारायचे घरात. पण तरी तशी ‘अच्छी बच्ची’ होते. आमचं घर जुन्या शिस्तीचं. माझे आजोबा परिसरातले मोठे राजकीय नेते. आमदारही होते काही काळ. घरातल्या पुरुषांची जेवणं झाल्याशिवाय बायकांनी जेवायचं नाही इथपासून जुनाट वळणाचं वातावरण.
मी हिंदी मीडिअममध्ये शिकले. दहावी पास झाल्यानंतरच मला ब्रेक घ्यायचा होता वर्षभर. काहीही न करण्याचा वेळ हवा होता मला. पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी. पण तेव्हा कुणी ऐकलं नाही माझं. वर्षभर गॅप घ्यायची म्हणते मुलगी, शाळा सोडायची म्हणते हे घरात कुणाला झेपलंच नाही. सगळे खवळले होते. एकच कल्लोळ झाला. केवढा मोठा राडा. रडारड. मला समजावण्याचे प्रयत्नही झाले.
पण मी ऐकलं नाही. घरातून निघालेच.
वडिलांनी, आजोबांनी तर माझं नावच टाकलं.
भांबलासारख्या छोटुशा शहरातून मी पळाले आणि दिल्लीत पोहोचले.
पाठीवर पोतडं होतंच. खेड्यापाड्यातल्या पण खानदानी जगण्याचं. घरातलं वातावरणच असं की, सतत बिचकत जगायचं. काहीही करावंसं वाटलं की कुठून तरी एक मोठ्ठा आवाज येणारच, ‘करू नको, करू नको, धोका आहे. उधर खतरा है, उधर भी, वो कोने में भी, इव्हन दॅट कॉर्नर इज डेंजरस....’
या घाबरण्याला कंटाळले होते मी.
किती आणि कुणाकुणाला घाबरत जगायचं?
आणि का?
म्हटलं पुष्कळ झालं. आयुष्यभर हे असं घुसमटत कोण जगेल?
दिल्लीत आले.
एका मॉडेलिंग एजन्सीबरोबर काम केलं. सोपं नव्हतंच काम मिळणं; पण त्यांना माझे लूक्स आवडले होते. त्याच काळात मी लोकप्रिय दिग्दर्शक अरविंद गौड यांच्या नाटकात काम केलं. त्यांनी माझं कौतुक तर केलंच; पण माझ्यात काहीतरी आहे अशी जाणीवही मला करून दिली.
- तो पहिला माणूस!
असं म्हणणारा की, तुम कुछ हो!!
त्या काळात तेवढं मला पुरेसं होतं.
छोटीशी का असेना, सुरुवात झाली होती. अभिनय करायला मिळाला, आपल्याला काय आवडतं, हे शोधून पाहण्याची संधी मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाही मध्यमवर्गीय मुलीला ज्यासाठी फार फार झगडा करावा लागतो, ती गोष्ट आयुष्यात पहिल्यांदाच हाती लागली - स्वत:वरचा विश्वास!
एलिट नावाच्या मॉडेल एजन्सीबरोबर मी काम करत होते. त्यांनी मला एका कॅटलॉग शूटसाठी मुंबईत पाठवलं. तेव्हाच गॅँगस्टरसाठी आॅडिशन्स सुरू होत्या.
मी आॅडिशन दिली.
...आणि मुंबईतच थांबले.
वाटलं होतं इथंच आपलं काहीतरी होईल.
सहा महिन्यांनी मला गॅँगस्टरमध्ये रोल मिळाल्याचं कळलं.
साठवलेल्या जेमतेम पैशांवर मुंबईतले ते पहिले सहा महिने कसे काढले, हे आता आठवावंसंही वाटत नाही.
एका स्वस्तातल्या लेडीज होस्टेलमध्ये राहिले. मुंबई नावाच्या या समुद्रात नाकातोंडात पाणी जाऊ न देता मुंडकं वर ठेवून नुस्तं तरंगत राहायचं झालं, तरी इथे आलेल्या कोणाही न्यू कमरला तीन गोष्टी लागतात.
इंग्रजी.
पैसे.
कॉन्टॅक्ट.
माझ्याकडे यांतली एकही गोष्ट नव्हती.
त्यात सुंदर दिसण्याच्या प्रचलित व्याख्येत, यशस्वी होण्यासाठी ‘मस्ट’ असलेल्या लिस्टमध्ये बसेल असं माझ्याकडे काहीही नव्हतं. बॉलिवूडमधे तर मी आउटसायडरच! माझ्यासारख्या हजारोंकडे बघतपण नाही ही दुनिया...
म्हटलं, जो है, सो है!
आता नाहीये मी सुंदर, तर काय करणार?
आणि इतर कुणी ठरवलेल्या व्याख्येमध्ये मी का बसवू स्वत:ला, असा एक माजही होता डोक्यात.
- तो अजूनही आहे म्हणा.
मी आहे अशी आहे.
आता नाहीयेत माझे केस सिल्की आणि स्टेÑट.
कुरळे आहेत! - तर आहेत.
नाहीयेत माझे डोळे निळे.
नाहीये माझी उंची ५-११ पेक्षा जास्त,
नाही जिंकली मी कुठली ब्यूटी क्राउनवाली स्पर्धा.
कुठला बडा अ‍ॅक्टिंग कोर्सही नाही केला, बड्या नावाजलेल्या संस्थेत अभिनय शिकल्याचा ठप्पाही नाही माझ्याकडे.
- मग??
पण हे सारं हवंच तुमच्याकडे असा काही नियम आहे का? आणि समजा, नसलं यातलं काहीच, तर?
- नसलं तर नसलं!
मी जशी आहे तशी मला आवडते.
मुंबईत आले, तेव्हा माज होता. मूर्खही होते मी. चिक्कार चुका केल्या. त्यांची वाट्टेल तेवढी किंमत मोजली. भलत्या लोकांना माझ्या आयुष्यात नको एवढं महत्त्व आणि जागा देऊन छळलं स्वत:ला. भुईसपाट होताना, पुरतं हरतानाही पाहिलंय...
- मग एक दिवस स्वत:ला ठोकठाक सांगून टाकलं, जे झालं ते झालं! जेवढे कमावले तेवढे कमावले अनुभव, आता ती कमाई सोबत घेऊन लागा कामाला...
और सब बदल गया!! सब कुछ. एव्हरीथिंग.


( लोकमत ‘दीपोत्सव’ 2015 या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संपादित अंश..)

 

Web Title: Kangana Ranaut on controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.