भारतीय बॅडमिंटन खेळाडू आणि गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज (suhas ly) यांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. त्यांना फ्रान्सच्या वर्ल्ड नंबर वन लुकास मजूरने 63 मिनिटांत 15-21, 21-17, 21-15 असे हरविले. 38 वर्षीय सुहास यांनी पॅरालिम्पकमध्ये बॅडमिंटन इव्हेंटमध्ये प्रमोद भगत च्या सुवर्ण पदकानंतर रौप्य पदक पटकावले. आता या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या पदकांची संख्या ही 18 झाली आहे. (Tokyo Paralympics, Badminton Men's Singles SL4: Noida DM Suhas L Yathiraj loses to France's Lucas Mazur, bags silver)
एसएल4 वर्गमध्येच तरुण ढिल्लो कांस्य पदकासाठीचा सामना गमावला. त्याला इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावा याने 32 मिनिटांमध्ये 21-17, 21-11 ने पराभूत केले. भारताच्या खात्यात सध्या 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदके आहेत. हा पॅरालम्पिकच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा आकडा आहे. रियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 2 सुवर्ण पदकांसह 4 पदके मिळविली होती.
सुहास याने ग्रुप-एचे दोन सामने जिंकले आणि सेमीमध्ये प्रवेश केला. पहिल्या सामन्यात सुहासने जेन निकलस पॉट याला 21-9, 21-3 सरळ सेटमध्ये हरविले. यानंतर पुढच्या सामन्यात त्याने इंडोनेशियाच्या हॅरी सुसांतो याला 21-6, 21-12 अशा फरकाने पराभूत केले. मात्र, शेवटच्या सामन्यात त्याला नंबर एकच्या खेळाडूकडून मात पत्करावी लागली.
सुहास यांच्या या दैदिप्यमान कामगिरीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतूक केले आहे.