आखातातील भाज्यांची निर्यात ठप्प; १६८१ कोटींचा व्यापार संकटात : लिंबू, मिरची, शेवगा, भेंडीला असते मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:05 IST2026-03-13T08:05:09+5:302026-03-13T08:05:28+5:30
मध्यपूर्वेतील युद्धामुळे या भाज्यांची निर्यात सध्या ठप्प झाली असून त्याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसत आहे.

आखातातील भाज्यांची निर्यात ठप्प; १६८१ कोटींचा व्यापार संकटात : लिंबू, मिरची, शेवगा, भेंडीला असते मोठी मागणी
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : भारतीय लिंबू, हिरवी मिरची, शेवगा, भेंडी आणि कारली यांसारख्या भाज्यांना आखाती देशांत वर्षभर मोठी मागणी असते. मात्र, मध्यपूर्वेतील युद्धामुळे या भाज्यांची निर्यात सध्या ठप्प झाली असून त्याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून सुमारे ३ लाख ७३ हजार टन भाजीपाला आठ आखाती देशांमध्ये निर्यात केला होता. या निर्यातीमधून १६८१ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह देशातील विविध कृषी बाजारपेठांमधून आखाती देशांकडे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पाठविला जातो. भाजीपाला निर्यातीत संयुक्त अरब अमिराती (यूएई) हा दीर्घकाळ प्रमुख बाजारपेठ राहिली आहे. सध्या बांगलादेशातून मागणी वाढल्याने यूएई दुसऱ्या क्रमांकावर गेले असले तरी आखाती देशांमध्ये भारतीय भाज्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
देशातून एकूण १२८ देशांमध्ये भाजीपाला निर्यात होत असून त्यातील सुमारे २३ टक्के हिस्सा आठ आखाती देशांचा आहे. या बाजारपेठेत भारतीय लिंबू, हिरवी मिरची, भेंडी, कोबी, फ्लॉवर, कांदा आणि शेवग्याच्या शेंगा यांना विशेष मागणी असते. मात्र, मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यामुळे सागरी वाहतूक विस्कळीत झाली असून आखाती देशांकडे होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात अडचणीत आली आहे. परिणामी निर्यातदारांना पर्यायी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागत आहे.
२०२४ - २५ मधील भाजीपाला निर्यात
देश किंमत (कोटी) निर्यात (टन)
युएई १०७३ २३८१२१
कुवेत २०२ ४७१२३
कतार १७७ ३७८८४
सौदी अरब १२९ २६२५७
बहरीन ९२ २०४१८
इराक ६ ३६१३
इस्त्राईल २ १८३
जॉर्डन ०.६१ ८५
भारतातील लिंबू, मिरची, शेवगा, कारली आणि भेंडी यांना आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांकडे होणारी निर्यात सध्या थांबली आहे. इतर देशांकडे निर्यात सुरू असली तरी आखाती बाजारपेठेतील अडथळ्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे.
शंकर पिंगळे, संचालक,
मुंबई बाजार समिती