तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:58 IST2026-04-08T11:58:15+5:302026-04-08T11:58:15+5:30
BJP Ganesh Naik NMMC News: नवी मुंबई महापालिकेत भाजपा नगरसेवकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर येऊ लागल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
BJP Ganesh Naik NMMC News: नवी मुंबईवर हुकूमत कोणाची, यावरून महानगरपालिका निवडणुकीपासून सुरू झालेला भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेश नाईकांना घेरण्याची संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. यातच आता नवी मुंबई महापालिकेतील अधिकारीही नगरसेवकांच्या वर्तनाने त्रस्त झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तब्बल पाच वर्षांनी पार पडल्या असून विविध सभा तसेच कामांसाठी आता महापालिका मुख्यालयात नगरसेवकांची ये-जा वाढली आहे. काही दिवसांपूर्वी महासभेला आलेल्या नगरसेवकांना पाचव्या मजल्यावर जाण्यासाठी एकच लिफ्ट सुरू होती. दुसरी लिफ्ट चौथ्या मजल्यावर सुमारे २० मिनिटांहून अधिक वेळ आयुक्त कैलास शिंदेंसाठी थांबवून ठेवली होती. सभेसाठी पाचव्या मजल्यावर सभेला जाणाऱ्या नगरसेवकांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी काही नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून लिफ्ट मॅनला सुनावले. हा मुद्दा सर्वसाधारण सभेतदेखील चर्चेला घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे तेथे उपस्थित नागरिक नगरसेवकांना काही किंमत आहे की नाही? असे आपसात म्हणत नसते तर नवलच. दुसरीकडे नगरसेवकांना नियम शिकवा, असे सांगत विरोधकांनी गणेश नाईकांवर टीका केली आहे
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा...
नवी मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. त्यातच महापालिका स्वायत्ता संस्था असून आम्ही करू तेच कायदे, राज्य शासन त्यांचे आदेश लादू शकत नाही, त्यांचे कायदे आम्हाला नको आहेत, असे भाजपचे सदस्य सांगू लागले आहेत. सभागृहात ते अशी वक्तव्य करीत आहेत. यामुळे विरोधकांनी यावरून भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनाच घेरले. तुम्ही मंत्री या नात्याने राज्य शासनाचे घटक आहात. तुमच्या विधी मंडळाने केलेले कायदे तुमचे नगरसेवक पाळत नाहीत. अशाने त्यांचे सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. ही आपबिती टाळण्यासाठी नाईक साहेब तुम्ही तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा, असे विरोधकच नव्हे तर अधिकारीही म्हणू लागले आहेत.
दरम्यान, नवी मुंबईतील घडामोडींमुळे ठाणे पालिकेतील विविध समित्या व स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत विचारले असता गणेश नाईक म्हणाले होते की, नवी मुंबईतील परिस्थिती वेगळी आहे. मात्र, ठाणे आणि कल्याण येथे महायुती म्हणून निवडणुका लढविण्यात आल्या असल्याने, त्यावेळी झालेल्या चर्चांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी
स्पष्ट केले.