नवी मुंबई विमानतळावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; धावपट्टीजवळच कत्तलखाने!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 06:18 IST2026-04-02T06:18:02+5:302026-04-02T06:18:26+5:30
उड्डाण घेणाऱ्या किंवा उतरणाऱ्या विमानाला या पक्षांची धडक बसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता

नवी मुंबई विमानतळावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; धावपट्टीजवळच कत्तलखाने!
नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन १०० दिवस उलटले असतानाच, विमानतळाच्या सुरक्षेबाबत त्रुटी समोर आल्या आहेत. धावपट्टीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उलवे परिसरात कत्तलखाने आणि मांसविक्री सुरू आहे. यामुळे विमानांना 'पक्षी-धडक'चा धोका असून, विमानतळ सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार, कोणत्याही विमानतळाच्या १० किलोमीटर परिघात उघड्यावर मांसविक्री, कत्तलखाने किंवा कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. उघड्यावर टाकलेल्या मांसाच्या अवशेषांमुळे घार, गिधाड यांसारखे मोठे पक्षी आकर्षित होतात. उड्डाण घेणाऱ्या किंवा उतरणाऱ्या विमानाला या पक्षांची धडक बसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, 'डीजीसीए'ने यासंदर्भात संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी टीका संस्थेचे संचालक बी. एन. कुमार यांनी केली आहे.
स्थानिकांची भीती
कार्यकर्ते करण चावला यांच्या मते, सणासुदीच्या काळात या परिसरात कत्तलीचे प्रमाण अधिक वाढते. उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पक्षांचा वावर वाढला असून, प्रशासनाने याकडे गांभीयनि पाहणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांकडून अभ्यास सुरू
विमानतळ प्रशासनाने पक्षी आणि वन्यजीवांमुळे निर्माण होणाऱ्या थोक्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेच्या 'जोखीम विश्लेषण' अहवालानंतर उपाययोजना केल्या जातील, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. मात्र, तोपर्यंत सुरक्षिततेचे काय? असा सवाल उपस्थित केला आहे.