Navi Mumbai: नवी मुंबईच्या विकास आराखड्याला लवकर मंजुरी द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:26 IST2025-06-20T08:25:56+5:302025-06-20T08:26:49+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईच्या विकास आराखड्याला लवकर मंजुरी द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी. महापालिकेने होर्डिंग आणि फेरीवाला धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. तसेच अशा प्रकारचे धोरण महापालिकास्तरावर मंजूर करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महापालिका आणि ऐरोली मतदारसंघातील प्रश्नांबाबत आढावा बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या वेळी वनमंत्री गणेश नाईक, माजी खा. संजीव नाईक आदी उपस्थित होते.
...या मागण्यांवर मार्ग काढा
नवी मुंबईतील विकास आराखड्यास मंजुरी, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करणे, महापालिका क्षेत्रातील विकास शुल्काच्या रक्कमेबाबत तसेच खारघर ते नेरूळ धक्का सागरी मार्ग बेलापूरमधून न घेता सेक्टर ११ बेलापूरमधून विमानतळाला जोडणे आदी मागण्यांबाबत मार्ग काढण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
आणखी एक रेल्वे स्थानक?
खारघर सेक्टर १६ ते नेरूळ जेट्टी या प्रस्तावित सागरी किनारा मार्गातील बेलापूर सेक्टर १५ येथे डबल डेकर रस्ता तयार करता येईल का? याचा विचार करावा. तसेच तुर्भे आणि कोपरखैरणे यांच्यामधील खैरणे गावाजवळ आणखी एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे
बारवी धरणग्रस्तांना ज्या प्रमाणे विविध महापालिकांमध्ये कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे, त्या प्रमाणेच मोरबे धरण व सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेण्यासंदर्भात कालबद्ध आराखडा तयार करावा. ऐरोली जेट्टी चोवीस तास सुरू ठेवणे, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प बाधित मच्छिमारांना भरपाई देणे, नवी मुंबईतील गावठाण विस्तारामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती कमी करणे, नवी मुंबई विमानतळामध्ये स्थानिकांना नोकरी देणे, दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांना पुनर्वसन म्हणून भूखंड देणे या विषयांवर मार्ग काढण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.