आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:23 IST2025-06-30T20:19:13+5:302025-06-30T20:23:01+5:30
नवी मुंबईत एका व्यक्तीने तीन वर्षे स्वतःला घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका
नवी मुंबईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत ५५ वर्षीय व्यक्तीने गेल्या ३ वर्षांपासून नैराश्यामुळे स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. ही व्यक्ती पूर्वी कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम करत होती. खोलीत कोंडून घेतलेल्या या व्यक्तीच्या आईवडीलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्याच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. यामुळे त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. ही व्यक्ती फक्त ऑनलाइन जेवण ऑर्डर करून बाहेरील जगाशी संपर्क साधत होती. मात्र एका सामाजिक संस्थेला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या व्यक्तीला गाठलं आणि मदत केली.
नवी मुंबईच्या घणसोलीतील सेक्टर २४ मध्ये राहणाऱ्या अनुप नायर यांनी आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतःला घरात कोंडून ठेवलं होतं. अनुप नायर हे पेशाने इंजिनियर होते. मात्र आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले. जेव्हा एका स्वयंसेवी संस्थेला त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अनुप नायर यांच्या घरी पोहोचून त्यांना कोंडीतून सोडवलं.
अनुप नायर यांच्या कुटुंबात आता कोणीही उरलेलं नाही. त्यांची आई पूनम्मा नायर भारतीय हवाई दलाच्या दूरसंचार विभागात काम करत होती, तर त्यांचे वडील व्हीपी कुट्टी कृष्णन नायर टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ६ वर्षांपूर्वी दोघांचेही निधन झाले. त्यांच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. या दुःखद घटनांनी अनुप हे नैराश्यात ढकलले गेले.
या काळात अनुप नायर कोणालाही भेटले नाहीत. त्यांचा फक्त ऑनलाइन फुड डिलिव्हरी करणाऱ्यांसोबत बाहेर पुरता संबंध होता. ते कधीही घराबाहेर पडले नाही. त्यांनी कधीही घराच्या बाहेर कचरा फेकला नाही. नायर राहत असलेल्या इमारतीमधील लोकांनी सांगितले की ते त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा क्वचितच उघडत असे. ते घरातील कचराही बाहेर काढत नसे, त्यामुळे इमारतीतील सदस्यांना कधीकधी त्याला कचरा बाहेर फेकण्यासाठी सांगावे लागत असे.
माहिती मिळाल्यानंतर एसईएएल नावाच्या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा फ्लॅटची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. रातील बहुतेक फर्निचर गायब झाल्यामुळे नायर फक्त खुर्चीवर झोपत असे. त्यांच्या पायांनाही गंभीर संसर्ग झाला होता. यासाठी त्वरित उपचारांची आवश्यकता होती. त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर काही नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अनुप कोणावरही विश्वास ठेवत नव्हते.
दरम्यान, नायर यांना पनवेलमधील एका आश्रमात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. "आता माझे कोणतेही मित्र नाहीत, माझे कुटुंब आधीच निघून गेले आहे. माझी तब्येत इतकी खराब आहे की मला नवीन नोकरीही मिळत नाही," असं नायर म्हणतात.