ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:38 IST2025-06-25T11:37:39+5:302025-06-25T11:38:08+5:30
Operation Sindoor: भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताने सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारताच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानच्या हवाई तळांवर जबरदस्त हल्ला करत पाकिस्तानला युद्धविरामासाठी विनवणी करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आजपासून सुरू होत असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या दोन दिवसीय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी चीनमधील किंगदाओ येथे दाखल झाले आहेत. तर तिथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ हेसुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानने परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. मात्र या संमेलनामद्ये राजनाथ सिंह आणि ख्वाजा आसिफ यांच्यामध्ये कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सर्व चर्चांना थांबवले आहे.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने शांघाई परिषदेबाबत दिलेल्या आपल्या अधिकृत वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, राजनाथ सिंह हे एससीओची तत्त्वे आणि उद्देशांबाबत भारताची कटिबद्धता अधोरेखित करतील. ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा दृष्टीकोन समोर ठेवतील. तसेच या भागामधील दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी संयुक्त आणि निरंतन प्रयत्नांसाठी आवाहन करतील. त्याशिवाय ते एससीओअंतर्गत व्यापार, आर्थिक सहकार्य आणि कनेक्टिव्हिटीला वाढवण्यावरही भर देतील.