भाजप आणि निवडणूक आयोग आगीशी खेळत आहे; ममता बॅनर्जींची केंद्र सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:07 IST2026-04-02T15:06:07+5:302026-04-02T15:07:02+5:30
West Bengal Assembly Election 2026 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

भाजप आणि निवडणूक आयोग आगीशी खेळत आहे; ममता बॅनर्जींची केंद्र सरकारवर टीका
West Bengal Assembly Election 2026 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल आणि भाजप सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच, आता मुर्शिदाबाद येथे आयोजित रॅलीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मालदा येथील घटनेवरून केंद्र सरकार, भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. राज्यातील परिस्थिती बिघडवण्यासाठी सुनियोजित कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप आणि निवडणूक आयोग आगीशी खेळत आहेत आणि मालदा येथील घटना ही त्याच घाणेरड्या कटाचा परिणाम आहे. एका वेगळ्या घटनेचा वापर करून संपूर्ण पश्चिम बंगालची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अधिकाऱ्यांच्या बदलीवर टीका
राज्यातील अनुभवी अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. हे अधिकारी राज्यातील परिस्थिती, भूगोल आणि सामाजिक स्थितीची चांगली माहिती असलेले होते. त्यांच्या जागी अशा केंद्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांना राज्यातील वास्तव परिस्थितीची माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.
बाहेरील अधिकारी परिस्थिती हाताळण्यात अपयशी
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, बाहेरील अधिकारी स्थानिक परिस्थिती समजून घेण्यात अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. या घटनांचा वापर करून भाजप संपूर्ण राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बंगालमध्ये निवडणुका रद्द करण्याचा भाजपचा डाव
मालदा येथे न्यायिक अधिकाऱ्यांच्या घेरावाच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती त्यांना देण्यात आली नव्हती आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरला आहे. मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे सात न्यायिक अधिकाऱ्यांना बंधक बनवण्यात आले होते. ममतांनी आरोप केला की, बंगालमध्ये विधानसभा निवडणुका रद्द करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव आहे.
अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
या संपूर्ण प्रकरणासाठी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार ठरवले आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था कमकुवत करण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
दोन टप्प्यात होणार विधानसभा निवडणुका
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. राज्यातील सर्व 294 जागांवर मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होणार आहे. TMC ने 291 उमेदवारांची घोषणा केली असून, उर्वरित 3 जागा सहयोगी पक्ष BGPM साठी सोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः भवानीपुर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने आतापर्यंत 274 उमेदवारांची घोषणा केली आहे.