Vivek Yadav : व्वा रे पठ्ठ्या! २० परीक्षांमध्ये अपयश, पण स्वप्न सोडली नाहीत; ड्रायव्हरचा लेक झाला मोठा अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:51 IST2026-03-13T18:50:04+5:302026-03-13T18:51:19+5:30
Vivek Yadav : आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने सलग २ वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं.

Vivek Yadav : व्वा रे पठ्ठ्या! २० परीक्षांमध्ये अपयश, पण स्वप्न सोडली नाहीत; ड्रायव्हरचा लेक झाला मोठा अधिकारी
स्वप्नं अशाच लोकांसाठी असतात ज्यांच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत असते. जर तुम्ही हार मानली नाही, तर यश एक ना एक दिवस नक्कीच मिळतं. हेच सिद्ध करून दाखवलं आहे एका ड्रायव्हरच्या मुलाने, ज्याने २० वेळा परीक्षांमध्ये अपयशी ठरूनही हार मानली नाही. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने सलग २ वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं.
विवेक यादव असं या तरुणाचं नाव असून त्याची ही 'सक्सेस स्टोरी' आव्हानांशी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी आहे. एका मुलाखतीत विवेक यादव सांगतो की, तो मध्य प्रदेशातील चंदेरीचा रहिवासी आहे. त्याचे वडील नवल सिंह यादव ड्रायव्हर आहेत आणि आई घरी शिवणकाम करते. आर्थिक अडचणी असूनही त्याच्या पालकांनी त्याला नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि कधीही कशाची कमतरता भासू दिली नाही.
विवेकने आपलं प्राथमिक शिक्षण चंदेरीच्या सरस्वती विद्या मंदिरमधून पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यानंतर सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू केली होती. विवेकने ५ वेळा MPPSC ची पूर्व परीक्षा, UPPSC च्या परीक्षा आणि CAPF व BPSC सह एकूण २० परीक्षा दिल्या, पण अपयशाचा सामना करावा लागला. मात्र प्रत्येक वेळच्या पराभवानंतरही हिंमत हारला नाही. प्रत्येक अपयशातून नवीन धडा घेतला आणि आपल्या स्वप्नांसाठी पुन्हा प्रयत्न केले.
राज्यस्तरीय आणि इतर परीक्षांनंतर त्याने UPSC साठी प्रयत्न केले. UPSC CSE 2024 च्या परीक्षेत त्याला यश मिळालं. ४१३ व्या रँकसह त्याची निवड 'असिस्टंट कमिशनर रेल्वे' या पदावर झाली होती. मात्र विवेकला 'आयपीएस' (IPS) व्हायचं होतं आणि म्हणूनच त्याने पुन्हा परीक्षा दिली. यावेळेस म्हणजेच UPSC CSE 2025 परीक्षेच्या निकालात त्याने ४८७ वा रँक (AIR 487) मिळवला आहे.
विवेकने हिंदी माध्यमातून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती. एकाच प्रयत्नात त्याने पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे यशस्वीपणे पार केले. त्याची ही गोष्ट सिद्ध करते की, हार न मानणारा माणूस कधीही मागे राहत नाही. त्याच्या संघर्षाने केवळ चंदेरीच नव्हे, तर संपूर्ण मध्य प्रदेश आणि देशातील लाखो तरुणांना प्रेरित केलं आहे.