उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मधुचंद्राच्या रात्रीपूर्वीच नववधू घरातून फरार झाली. एवढंच नाही तर तिने जाताना सोबत लाखो रुपये किमतीचे दागदागिनेही नेल्याने सासरच्या मंडळींच्या तोंडचं पाणी पळालं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या नववधूचा पती आणि त्याचं कुटुंब पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस आरोपी नववधूचा शोध घेत आहेत.
ही घटना महाराजगंज येथील घुघली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर बल्डिहा येथे घडली आहे. येथील रहिवासी असलेल्या मनिष याचा विवाह ७ फेब्रुवारी रोजी कोठीभार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणीसोबत झालला होता. १० फेब्रुवारीला नववधू सासरी आली. घरात पाहुण्यांची गर्दी असल्याने नणंदेने नववधूच्याच खोलीत आपले दागदागिने ठेवायला दिले होते.
''मी पत्नीला लग्नात साडेतीन लाख रुपयांचे दागिने दिले होते. तर सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने माझ्या बहिणीचे होते. दरम्यान, माझी पत्नी हे सर्व दागदागिने घेऊन फरार झाली’’, असे पीडित पतीने सांगितले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये पतीने लिहिले की, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सर्व लोक जेवणाची तयारी करत होते. तेव्हाच संधी साधून ही नववधू घरातून दागदागिने घेऊन फरार झाली.
रात्रभर शोध घेऊनही ही नववधू न सापडल्याने अखेर पती आणि सासरच्या मंडळींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. दरम्यान, माहेरच्या मंडळींनीही तिच्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचा दावा केला आहे. मात्र नववधूचे कुटुंबीयही यात सहभागी असल्याचा आरोप पीडित पतीने केला आहे.