होर्मुझ सामुद्रधुनीवर कुठल्याही एका देशाची मालकी नाही; ट्रम्प-मोदी यांच्यात काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 23:50 IST2026-03-24T23:48:33+5:302026-03-24T23:50:16+5:30
ऊर्जेच्या किमती आणि पुरवठ्यावर परिणाम करणारी कोणतीही कृती ही जागतिक चिंतेची बाब आहे आणि ती रोखलीच पाहिजे असं सांगत राजदूत गोर यांनी इराणवर आरोप केला.

होर्मुझ सामुद्रधुनीवर कुठल्याही एका देशाची मालकी नाही; ट्रम्प-मोदी यांच्यात काय झाली चर्चा?
नवी दिल्ली - मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चेत पश्चिम आशियातील सध्याची स्थिती आणि स्ट्रेट होर्मुझ खुला करण्याच्या मुद्द्यावर विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती अमेरिकन राजदूत सर्जिया गोर यांनी दिली.
सर्जिया गोर यांनी म्हटलं की, या दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा खूप सकारात्मक आणि उपयोगी राहिली. स्ट्रेट ऑफ होर्मुझ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्राचा हिस्सा आहे आणि कुठलाही देश यात अडथळा आणणे आणि त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करू शकत नाही. हा मार्ग प्रत्येक वेळी खुला आहे आणि तो सुरक्षित राहिला तर जगभरात ऊर्जा पुरवठा प्रभावित होणार नाही. या जलमार्गातून होणारा तेल, वायू आणि इतर ऊर्जा संसाधनांचा पुरवठा केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावरून जहाज कुठल्याही भीतीशिवाय प्रवास करेल आणि जागतिक पुरवठा साखळी खंडीत होणार नाही हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर भारताची भूमिका काय?
ट्रम्प-मोदी चर्चेदरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भारताला विनंती करण्यात आली का? असे जेव्हा राजदूत सर्जिया गोर यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देण्यास नकार दिला. ही चर्चा खाजगी होती आणि सर्व तपशील सार्वजनिक करणे अनुचित होते. कोणताही देश या जलमार्गाला ओलीस ठेवू शकत नाही, यावर संपूर्ण जगाचे एकमत आहे असं त्यांनी सांगितले. इंडिया टूडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या चर्चेवर भाष्य केले.
दरम्यान, इराण सध्या या प्रदेशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, जे अमेरिकेला अस्वीकार्य आहे. ऊर्जेच्या किमती आणि पुरवठ्यावर परिणाम करणारी कोणतीही कृती ही जागतिक चिंतेची बाब आहे आणि ती रोखलीच पाहिजे असं सांगत राजदूत गोर यांनी इराणवर आरोप केला.
भारताच्या सूचनांचे स्वागत
दोन्ही नेत्यांच्या चर्चेत भारताची भूमिका काय होती असा प्रश्न विचारला त्यावर केवळ भारत सरकारच यावर अधिक चांगले उत्तर देऊ शकते असं त्यांनी म्हटलं. अमेरिका भारताच्या सूचनांचे आणि सहभागाचे नेहमीच स्वागत करते. पंतप्रधान मोदी एक अनुभवी आणि प्रभावशाली नेते आहेत. त्यांचे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दीर्घकाळापासून घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. अमेरिका भारताला एक महत्त्वाचा भागीदार मानते आणि म्हणूनच दोन्ही देशांमध्ये अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सतत संवाद सुरू असतो. फोनवरील संभाषणाचा मुख्य संदेश होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही परिस्थितीत खुली ठेवणे हा होता. कारण सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक जहाजे तिथे अडकली आहेत आणि त्यांना त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे असं सर्जिया गोर यांनी सांगितले.