संकटकाळातही भारतानं निभावला 'शेजारधर्म'; एका कॉलवर ३८००० मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:29 IST2026-03-28T16:28:42+5:302026-03-28T16:29:55+5:30
युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी खंडीत झाली असून एकमेकांना ऊर्जा सहकार्य करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली

संकटकाळातही भारतानं निभावला 'शेजारधर्म'; एका कॉलवर ३८००० मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवलं
नवी दिल्ली - पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासह शेजारील राष्ट्रांनाही ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकाही यात समाविष्ट आहे, ज्याने भारताकडे मदत मागितली आणि भारतानेही पुन्हा एकदा चांगला शेजारधर्म निभावला. भारताने श्रीलंकेच्या मागणीवर ३८ हजार मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थ त्याला पाठवले आहेत. त्यात २० हजार मेट्रिक टन डिझेल आणि १८ हजार मेट्रिक टन पेट्रोलचा समावेश आहे. कोलंबोतील भारतीय उच्चायुक्ताच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदींशी साधला होता संवाद
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर आज भारताने श्रीलंकेला मदत केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य करण्यात आले. युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी खंडीत झाली असून एकमेकांना ऊर्जा सहकार्य करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिसानायके यांच्या चर्चेपूर्वी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांच्यात फोनवरून संवाद झाला होता.
श्रीलंकेत भयंकर ऊर्जा संकट
श्रीलंकेने भारताच्या इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून ३८ हजार मेट्रिक टन पेट्रोलियम पुरवठा करण्याची विनंती केली होती. रिपोर्टनुसार, भारत सरकार श्रीलंकेच्या आयओसीला तेलपुरवठा कायम ठेवण्यासाठी पाठिंबा देत आहे. श्रीलंकन आयओसीने यापूर्वी पश्चिम आशिया आणि सिंगापूरकडून मार्च महिन्यासाठी तेलपुरवठा मिळवला होता. परंतु पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठादारांनी तेल पोहोचवण्यास असमर्थता दर्शवली.
संकटाच्या काळात भारताने पुढे केला मदतीचा हात
भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश आहे. सर्वसाधारण परिस्थितीतही भारत बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव यांसारख्या देशांना तेलाचा पुरवठा करतो. सध्याच्या संकटात भारताने यापूर्वी बांगलादेश आणि मालदीवला अशीच मदत पाठवली आहे.
दरम्यान, तेल संकटाचा श्रीलंकेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे आणि बस स्थानके ओस पडली आहेत. शाळा आणि कार्यालये बंद केली जात आहेत. घरून काम करण्याचे कठोर नियम पुन्हा लागू करण्यात आले आहेत. इंधन वाचवण्यासाठी बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयांमधील एसी बंद आहेत. रस्त्यावरील दिवे आणि जाहिरात फलकही बंद करण्यात आले आहेत.