Toll Plaza: टोल नाक्यांबाबत नितीन गडकरींनी घेतला मोठा निर्णय, ६० किमीमागे असेल केवळ एक टोल प्लाझा, तर स्थानिकांना मिळेल पास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 20:16 IST2022-03-22T20:15:42+5:302022-03-22T20:16:21+5:30
Toll Plaza News: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री itin Gadkari यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल. तर स्थानिकांना आता टोल द्यावा लागणार नाही.

Toll Plaza: टोल नाक्यांबाबत नितीन गडकरींनी घेतला मोठा निर्णय, ६० किमीमागे असेल केवळ एक टोल प्लाझा, तर स्थानिकांना मिळेल पास
नवी दिल्ली - येणाऱ्या काळात महामार्गांवरून प्रवास करणे स्वस्त होणार आहे. कारण याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून, त्यासाठी एक प्लॅनही तयार करण्यात आला आहे. सरकार एका निश्चित कालावधीमध्ये एकवेळाच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि सातत्याने महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आखण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल. तर स्थानिकांना आता टोल द्यावा लागणार नाही. सरकारची ही योजना पुढच्या ३ महिन्यांमध्ये लागू होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, सरकार येत्या ३ महिन्यांमध्ये देशातील टोल नाक्यांची संख्या कमी करणार आहे. तसेच ६० किमीच्या अंतरामध्ये केवळ एकट टोल प्लाझा सुरू राहील. नितीन गडकरींनी सांगितले की, पुढच्या तीन महिन्यांमध्ये ६० किमीच्या अंतरामध्ये येणारे अन्य टोल नाके बंद केले जातील.
नितीन गडकरींनी टोल नाक्यांजवळ राहणाऱ्यांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहेत. त्यांनी सांगितले की, टोल नाक्यांजवळ राहणाऱ्यांना टोल द्यावा लागणार नाही. त्यांच्यासाठी पास जारी केला जाईल. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच अधिकाधिक लोकांना टोल देऊन महामार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रेरित करता येईल.
केंद्र सरकार सध्या महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान, टोलमधून सवलत देण्यात यावी अशी टोल नाक्याजवळ राहणाऱ्यांकडून सातत्याने मागणी करण्यात होती. कारण त्यांना त्या मार्गावरून वारंवार प्रवास करावा लागे.