Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:37 IST2026-04-06T11:28:41+5:302026-04-06T11:37:18+5:30
Abhishek Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत TMC वारंवार जिंकून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली आहे, म्हणूनच केंद्र सरकारने येथील जनतेला उपाशी मारण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून राज्याची थकबाकी रोखून धरली आहे असं बॅनर्जी म्हणाले.
पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेनुसार, पूर्व बर्धमान जिल्ह्यातील रैना येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, "जर मी खोटं बोलत असेन तर भाजपाने पुराव्यासह त्याचं खंडन करावं आणि मला जेलमध्ये टाकावं. केंद्राने राज्याच्या प्रकल्पांसाठी १ लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी अद्याप जारी केलेली नाही. बंगालच्या जनतेने सलग विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता दिल्याने येथील गरीब जनतेला उपाशी मारण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचललं आहे."
"ममता बॅनर्जींनी आव्हानाचा खंबीरपणे केला सामना"
पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघाचे खासदार यांनी "केंद्राने कितीही अडचणी निर्माण केल्या असल्या, तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सर्व आव्हानाचा खंबीरपणे सामना केला आहे. ग्रामीण रोजगारासाठी 'कर्मश्री', घरांसाठी 'बंग्लार बारी' आणि पाणीपुरवठा योजनांसारखे प्रकल्प राज्याने स्वतःच्या संसाधनांतून राबवले आहेत" असं म्हटलं आहे.