तृणमूलसमोर गड राखण्याचे आव्हान; सत्तेकडे वाटचाल करण्यास भाजपचा जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:55 IST2026-03-30T07:55:09+5:302026-03-30T07:55:25+5:30
मतांची टक्केवारी वाढवण्यावर भर, ममतांना मागील २१५ जागांचा टप्पा गाठता येईल का?

तृणमूलसमोर गड राखण्याचे आव्हान; सत्तेकडे वाटचाल करण्यास भाजपचा जोर
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सामना आता स्पष्टपणे दोन ध्रुवांमध्ये विभागलेला दिसत आहे. तृणमूल काँग्रेस यावेळी आपला गड टिकवण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष भाजप सत्तेच्या अधिक जवळ पोहोचण्यासाठी ठोस रणनीती आखत आहे. निवडणुकीचे संपूर्ण चित्र आता 'सत्ता राखणे अन् सत्ता काबीज करणे' अशा थेट संघर्षात रूपांतरित झाले आहे. याच थेट सामन्यामुळे बंगालची ही निवडणूक अलीकडच्या काळातील सर्वात महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरत आहे.
२०२१ च्या निवडणुकीत तृणमूल विरुद्ध भाजप अशा दुहेरी लढतीचे चित्र स्पष्ट नव्हते, मात्र निकालांनी हे सिद्ध केले की खरी लढत या दोनच पक्षांमध्ये होती. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना आपली छाप उमटवता आली नाही. राजकीय तज्ज्ञांच्या मते, २०२६ ची निवडणूक बंगालच्या राजकारणासाठी निर्णायक टप्पा ठरू शकते. एका बाजूला तृणमूल काँग्रेस आपला भक्कम जनादेश कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजप अधिक चांगली कामगिरी करत ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कमी करून सत्तेच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.
ही निवडणूक केवळ जागांची नाही, तर राज्यातील राजकीय संतुलन बदलू शकते. बंगालमध्ये प्रादेशिक वर्चस्वाचा मॉडेल कायम राहणार की राष्ट्रीय विस्ताराच्या राजकारणाला स्वीकारले जाणार, याचा निर्णय या निवडणुकीत होणार आहे.
यंदाची लढत का ठरत आहे वेगळी ?
बंगालच्या राजकारणात दीर्घकाळ बहुकोणी लढतीची परंपरा राहिली आहे. सुरुवातीला डाव्या पक्षांचे वर्चस्व, त्यानंतर तृणमूल काँग्रेसचा उदय पण २०२६ मध्ये प्रथमच चित्र स्पष्टपणे दुहेरी लढत दिसत आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच सत्ताधारी तृणमूलला भाजपसारख्या मजबतचा टक्का सुमारे ३८% पर्यंत पोहोचला होता. यावेळी तो वाढला तर भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. आता सत्ताबदलाची चर्चा केवळ शक्यतेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट निवडणुकीच्या मुख्य चर्चेचा भाग बनली आहे.
भाजप करणार का सत्तेकडे वाटचाल?
राजकीय ताकद : राष्ट्रीय मुद्द्यांसोबत स्थानिक असंतोष जोडण्याची रणनीती भाजपची रणनीती राहील. केंद्रीय नेतृत्व : बंगालसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार करतील, असे दिसते. संघटन : भाजपने कायमचे बूथ स्तरापर्यंत संघटनेचा विस्तार केला आहे. बंगालमध्येही हेच धोरण आखले आहे. प्रचाराचा मुद्दा : भ्रष्टाचार विरुद्ध विकास हा मुद्दा अधिक तीव्र करण्याची शक्यता. भाजपसाठी स्गिंव फायद्याचा? २०१६ आणि २०२१ या दोन्ही निवडणुकांमध्ये ४० पेक्षा अधिक जागांवर विजयाचा फरक ५ हजार मतांपेक्षा कमी होता. त्यामुळे केवळ २ ते ५ टक्के मतांचा स्विंगही काही निकाल उलथवू शकतो.
तृणमूलसमोर मागील निवडणुकीपेक्षा मोठे आव्हान
सत्ताविरोधी लाट : १५ वर्षाच्या सत्तेनंतर स्थानिक पातळीवर नाराजी वाढलेली दिसते. भ्रष्टाचाराचे आरोप : शिक्षक भरती, नगरपालिकांशी संबंधित मुद्द्यांमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला. यावर तृणमूलने ७४ आमदारांचे तिकीट कापले. ताकद : महिला व अल्पसंख्याक मतदारांवरील मजबूत पकड, तसेच बूथ स्तरापर्यंत मजबूत संघटनात्मक जाळे.