कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:10 IST2025-06-29T19:09:13+5:302025-06-29T19:10:03+5:30
"मी अनुमानांवर विश्वास ठेवत नाही. आम्हाला खात्री आहे की, हायकमांडला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांना संधी देण्यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल..."

कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
कर्नाटकचेकाँग्रेस आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी रविवारी (२९ जून २०२५) मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानुसार कर्नाटकात मोठा 'उलटफेर' होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना पुढील दोन ते तीन महिन्यांच्या आत राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते, असे हुसेन यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षाच्या अखेरपर्यंत कर्नाटकात नेतृत्व बदल होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच हुसेन यांचे हे विधान आले आहे. हुसेन हे शिवकुमार यांचे अगदी जवळचे मानले जातात.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस आमदार हुसेन म्हमाले, हा विजय मिळवण्यासाठी कुणी संघर्ष केला? कुणी घाम गाळला? हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांची (शिवकुमार यांची) रणनीती आणि कार्यक्रम आता इतिहास आहे. हुसेन रामनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी, शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती? असा प्रश्न केला असता, हुसेन म्हणाले, मी अनुमानांवर विश्वास ठेवत नाही. आम्हाला खात्री आहे की, हायकमांडला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांना संधी देण्यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.
यावर, डीके शिवकुमार या वर्षात मुख्यमंत्री होतील? असा प्रश्न केला असता, आमदार इकबाल हुसेन यांनी हो असे उत्तर दिले. एवढेच नाही तर, पुढील दोन ते तीन दिवसांत निर्णय होऊन जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र तथा काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार यतींद्र सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्री बदलासंदर्भातील चर्चा केवळ अंदाज असल्याचे म्हणत फेटाळली होती. यावर हुसेन म्हणाले, "२०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हायकमांडने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही सर्वजण दिल्लीत एकत्र होतो. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्णय घेतला, हे सर्वांनाच माहित आहे आणि तेच पुढचा निर्णयही घेतील, तोवर आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.