आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'समाजवाद' आणि 'धर्मनिरपेक्षता' हे शब्द जोडले गेले. हे दोन्ही शब्द असावेत की नको, यासंदर्भात विचार व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत हे दोन्ही शब्द नव्हते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले आहे. तसेच, इंदिरा गांधी यांनी 50 वर्षांपूर्वी, लादलेल्या आणीबाणीसंदर्भात काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणीही होसबळे यांनी यावेळी केली.
आणीबाणी लादली, ते आज संविधान खिशात घेऊन फिरत आहेत... -राजधानी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना होसबळे म्हणाले, "ज्यांनी आणीबाणी लादली, ते आज संविधान खिशात घेऊन फिरत आहेत. त्यांनी आजपर्यंत देशातील जनतेची माफी मागितली नाही. त्यांनी देशाची माफी मागायला हवी. आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देत ते म्हणाले, आणीबाणी दरम्यान तब्बल एक लाख लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
६० लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली, न्यायव्यवस्थेला पंगू बनवण्यात आले -होसबळे पुढे म्हणाले, आणीबाणीच्या काळात ६० लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती आणि २५० पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले होते. एवढेच नाही तर, न्यायव्यवस्थेला पंगू बनवण्यात आले होते, मात्र माफी मागितली गेली नाही. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, ही चूक तुमच्या पूर्वजांनी केली होती, यामुळे तुम्ही देशाची माफी मागायला हवी.