नौदल समुद्रामार्गे पाकिस्तानवर हल्ला करणार होते, पण मग... 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल एक मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 21:40 IST2026-04-01T21:24:50+5:302026-04-01T21:40:32+5:30
'ऑपरेशन सिंदूर'मधील नौदलाच्या भूमिकेबद्दल बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी म्हणाले की, आम्ही समुद्रातून पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून फक्त काही मिनिटे दूर होतो, तेव्हा त्यांनी हल्ला थांबवण्याची विनंती केली, ही गोष्ट आता गुपित राहिलेली नाही.

नौदल समुद्रामार्गे पाकिस्तानवर हल्ला करणार होते, पण मग... 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल एक मोठा खुलासा
'ऑपरेशन सिंदूर' बाबत आता नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मोठा खुलासा केला आहे. 'भारतीय नौदल समुद्रातून पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून काही मिनिटेच दूर होते, तेव्हा पाकिस्तानने हल्ला थांबवण्याची विनंती केली', असा खुलासा त्यांनी केला. गेल्या वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील उल्लेखनीय सेवेबद्दल दोन वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांना 'युद्ध सेवा पदक' प्रदान करण्याच्या नौदल सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
नौदलाच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, "हे काही गुपित नाही की आम्ही पाकिस्तानवर सागरी हल्ला करण्यापासून काही मिनिटेच दूर होतो, तेव्हा त्यांनी थांबण्याची विनंती केली. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करून अनेक भारतीय पर्यटकांना ठार केले होते. त्यांचा धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामुळे देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती.
भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या अनेक भागांवर हवाई हल्ले करून १०० हून अधिक लश्कर-ए-तोयबा आणि जैशच्या दहशतवाद्यांना ठार केले. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आणि पाकिस्ताननेही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने हे हल्ले हाणून पाडले आणि त्यानंतर अनेक पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करून त्यांच्या सैन्याचे मोठे नुकसान केले. चार दिवसांनंतर, पाकिस्तानच्या विनंतीनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.
इराण-अमेरिका युद्धावर विधान
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबद्दल बोलताना ते म्हणाले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून या प्रदेशात २० हून अधिक व्यापारी जहाजांवर हल्ले झाले आहेत. या प्रतिकूल वातावरणात अंदाजे १,९०० जहाजे अडकून पडली आहेत. संघर्षापूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी दैनंदिन वाहतूक सरासरी सुमारे १३० जहाजांवरून आता सहा ते सात जहाजांपर्यंत मोठ्या प्रमाणात घटली आहे, असेही ते म्हणाले.
"विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान आणि धोरणांनी फक्त संघर्षांचे नियोजन, सुरुवात आणि सातत्य कसे राखले जाते यालाच नव्याने आकार दिला नाही, तर अपारंपरिक आव्हानांना तोंड देणे अधिक गुंतागुंतीचे आणि कमी अंदाजण्याजोगे बनवले आहे. परिणामी, सध्याच्या सागरी वातावरणात या घटकांमध्ये काळजीपूर्वक समन्वय साधणे आवश्यक आहे, असेही अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले.